THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणाचे आदेश सरकारला द्यावेत !

  

                     पुरोगामी महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हि पूर्णतः मृत्युशय्येनवर आहे हे कळवा , नांदेड , घाटी ,नागपूर शासकीय रूग्णालयातील मृत्यू तांडवावरून पुन्हा एकदा अधोरेखित होते आहे .  वस्तुतः या अपवादात्त्मक घटना नसून सार्वजनिक  आरोग्य व्यवस्थेची अशीच दयनीय अवस्था ग्रामीण भागातील आरोग्य  उपकेंद्रे  , प्राथमिक आरोग्य केंद्रे  ,ग्रामीण रुग्णालये , उपजिल्हा -जिल्हा  रुग्णालयांपर्यत आहे . एवढेच नव्हे तर काही हजार करोड रुपयांचे बजेट असणाऱ्या  महापालिका रुग्णालयांची , सरकारच्या रुग्णालयांची अवस्था देखील "असून अडचण , नसून खोळंबा " अशीच असल्याचे दिसते .        चर्चा फक्त मृत्यू पावलेल्या रुग्णांची करणे पुरेसे असत नाही , रुग्णालयात  दाखल झाल्यानंतर योग्य उपचार मिळणाऱ्या रुग्णांबाबत देखील चर्चा  होणे निकडीचे आहे .

 

               योग्य त्या सुविधांअभावी रुग्णालयात होणारे मृत्यू हे मानवाच्या जगण्याच्या अधिकारावरच ( Right to Live )  घाला घालणारे ठरतात . ना सरकार ना प्रशासन  आरोग्य सेवेच्या बाबतीत संवेदनशील नसल्याचे  दिसतात . आजवरच्या अनुभवावरून तरी सरकार कडून स्वयंप्रेरणेने सरकारी आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयन्त केले जातील असे दिसत नाही .   या पार्श्वभूमीवर राज्य मानवाधिकार आयोगाने आगामी एक वर्षात  जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार महाराष्ट्र राज्यात  वर्तमान  लोकसंख्येस अनुसरून आवश्यक अशा दर्जेदार , पायभूत सुविधा आणि मनुष्यबळानी परिपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य सरकारला द्यावेत .

 

                   राज्यातील त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था उत्तम , कार्यक्षम आणि करदात्या नागरिकांना उत्तरदायी बनवण्याचे काम राज्य सरकारचे असून देखील  महाराष्ट्र राज्यात नागरिकांना संविधानाने प्राप्त दर्जेदार  ,गुणवत्तापूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था या मूलभूत अधिकाराची पायमल्ली वर्तमान महाराष्ट्र राज्य सरकार आजवरच्या सर्वच राज्य  सरकारांकडून   सातत्याने  होते आहे . आज राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था स्वतःच्या मृत्युशय्येवर आहे , व्हेंटिलेटरवर आहे , रुग्णालये हि मृत्यूची आगारे बनलेली दिसतात हि त्याचीच परिणीती ठरते आहे  .

 

                 राज्य सरकारचे राज्य सरकारच्या अखत्यारीतील आरोग्य यंत्रणा नियंत्रण करणाऱ्या घटकांचे आरोग्य व्यवस्थेकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून  येते आहे . सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत शासन -प्रशासन , लोकप्रतिनिधी , सरकार असंवेदनशील , उदासीन असल्याचे दिसते . कोरोना आपत्तीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची लक्तरे  समोर आणल्यानंतर देखील सरकारच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या धोरणात कुठलाही बदल होताना दिसून येत नाही   .

                     ग्रामीण भागात उपकेंद्र , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती वर्षानुवर्षे बांधून धूळखात पडलेल्या आहेत . बंद असलेल्या इमारतींच्या देखभालीवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो आहे .  आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी जागतिक बँकेने दिलेल्या मदतीचा , कर्जाचा विनियोग योग्य रीतीने करता त्याला आर्थिक भ्रष्टाचाराची वाळवी लागलेली आहे  . ज्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था कार्यरत आहे तिथे आवश्यक पायाभूत सुविधा  , आवश्यक प्रमाणात परिचारिका , डॉक्टरांची कमतरता आहे .

                   कोळसा उगाळावा तितका काळा या नुसार सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची अवस्था आहे . एकुणातच राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य प्रति केल्या जाणारया दुर्लक्षामुळे  नागरिकांना संविधानाने प्राप्त दर्जेदार  ,गुणवत्तापूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था या मूलभूत अधिकाराचे महाराष्ट्र राज्य सरकारकडून होणाऱ्या पायमल्ली होते आहे  .

                     राज्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेच्या  हक्काची पूर्तता करण्यासाठी  मानवाधिकार आयोगाने   राज्य सरकारला आगामी वर्षात  जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार महाराष्ट्र राज्यात  वर्तमान  लोकसंख्येस अनुसरून आवश्यक अशा दर्जेदार , पायभूत सुविधा आणि मनुष्यबळानी परिपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश द्यावेत . आगामी महिन्यात राज्य सरकारला नागरिकांच्या आरोग्य या मूलभूत हक्काची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायती पासून ते महानगरपालिका क्षेत्रात  "सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षमी करणाबाबतचा आरखडा " तयार करण्याचे निर्देश देऊन त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत .  प्रामाणिक अंमलबजावणी होण्यासाठी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तटस्थ उच्च स्तरीय समिती स्थापन करावी .

 

               राज्यातील जनतेचा राज्य सरकारला प्रश्न आहे की   काय दोष आहे हो , मृत पावलेल्या नवजात बालकांचा ? महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात जन्म घेण्याची वेळ आली हाच त्यांचा दोष ठरतो का ? गरिबी हाच मृत पावलेल्या अन्य रुग्णांचा दोष ठरतो का ? पुरोगामी -प्रगत महाराष्ट्रात गरिबांना  सुदृढ -निरोगी जगण्याचा अधिकारच नाही का ?

 प्रश्न केवळ मृत पावलेल्या निष्पाप बालके , नागरिकांपुरता मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा आहे .   मिळणाऱ्या  आवश्यक उपचारांमुळे रुग्णांच्या तब्येतीची जी हेळसांड होते आहे त्याकडे देखील संवेदनशील पणे लक्ष देणे नितांत गरजेचे आहे .

                  राज्य सरकारचा अंकुश आणि धाक उरलेला नसल्याने सरकारी सेवेत असणारी डॉक्टर मंडळी ड्युटीला उपस्थितच राहत नसल्याचे ठिकठिकाणी दिसते . खाजगी प्रॅक्टिस करण्यास प्रतिबंध असून देखील शासकीय सेवेत असणारे अनेक डॉक्टर्स खाजगी प्रॅक्टिस करत आहेत .

 राज्यातील सरकारी आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पुढील उपाय योजना करण्याचे निर्देश मानवी हक्क आयोगाने द्यावेत हि जनभावना आहे .

 

दृष्टिक्षेपात संभाव्य उपाय : 

) प्राप्त माहिती नुसार राज्यात १०५०० उपकेंद्रे , १८२० प्राथमिक आरोग्य केंद्रे , ८० उपजिल्हा रुग्णालये आणि ३६५ ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत . वस्तुतः राज्याच्या १३/१४ करोड जनतेसाठी हि व्यवस्था पुरेशी आहे का याचा देखील आढावा घेणे गरजेचे आहे .  कार्यरत असणाऱ्या सर्व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे पायाभूत सुविधा , आवश्यक कुशल -अकुशल मनुष्यबळ , उपलब्ध वैद्यकीय सुविधा या निकषांच्या अंगाने वस्तुनिष्ठ परीक्षण केले जावे .

) राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे  वस्तुनिष्ठ वास्तव जनतेसमोर  येण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश द्यावेत . या यामध्ये  नियमानुसार आवश्यक पायाभूत सुविधा आणि उपलब्ध पायाभूत सुविधा , आवश्यक कुशल -अकुशल मनुष्यबळ आणि उपलब्ध कुशल -अकुशल मनुष्यबळ याची सविस्तर माहिती असावी .

) वर्तमानात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी -अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करून त्यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीशी जोडावे जेणेकरून कार्यालयीन वेळ पालनाच्या बेशिस्तीला कार्यालयीन वेळेत खाजगी क्लिनिक चालवण्याच्या कार्यपद्धतीला  लगाम बसेल .

) खरेदी केलेल्या औषधांना अनधिकृत पद्धतीने फुटणाऱ्या वाटा रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सीजीएचएस व्यवस्थेत ज्या प्रकारे औषधांचे वितरण हे ऑनलाईन पद्धतीने केले जाते  , रुग्णांना कोणती औषधी दिली , किती औषधे दिली याचा एसएमएस जातो त्याच पद्धतीचा वापर औषध वितरणासाठी अनिवार्य करा  .

) आमदार -खासदार निधीतून कार्यकर्त्यांना पोसणारी कामे बंद करून त्या निधीचा वापर आगामी वर्षासाठी केवळ आणि केवळ आपापल्या क्षेत्रातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी  करण्याचा कायदा करा .

) राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी -अधिकाऱ्यांना खाजगी व्यवस्थेतून उपचार करण्यासाठी दिली जाणारी रक्कम पूर्णपणे बंद करून सर्व नोकरशाहीला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतच उपचार घेणे सक्तीचे करावे . हाच नियम आमदार -खासदारांना देखील लागू करावा . त्यांना मान्य नसेल तर स्वखर्चाने खाजगी हॉस्पिटलमधून उपचार घेण्याची मुभा द्यावी .

  हा सर्वात जालीम 'उपचार ' ठरू शकतो कारण ज्याचे जळते ,त्याला कळते या म्हणी नुसार जेंव्हा स्वतःवर वेळ येईल तेंव्हाच त्यांना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्व कळेल .  प्रशासन आणि राजकीय नेत्यांना चटके बसले की  १०० नव्हे तर २०० टक्के आरोग्य व्यवस्था सक्षम होऊ शकते .

) आरोग्य व्यवस्थेवर किमान १० टक्के खर्च केला तर आणि तरच अन्य विकास कामासाठी निधी देण्याचा कायदा केला जायला हवा . 

) सरकारी आरोग्य व्यवस्थेची  परिपूर्ण माहिती करदात्या नागरिकांसमोर मांडण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर केल्या जाणाऱ्या निधीचा अपव्यय टाळण्यासाठी  सरकारला संकेतस्थळ , अँप तयार करण्याची सक्ती करावी .

) प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला महिन्यातून आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आकस्मिक भेट देणे सक्तीचे करावे . आकस्मिक भेटीत जमिनीवरील वास्तव काय दिसले याचा लेखाजोखा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य असावे .

१०) रुग्ण हा ग्राहक असल्याने त्याला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत येणाऱ्या अनुभवाबाबत फीडबॅक देण्यासाठी  व्यवस्था निर्माण केली जावी  .

) प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला महिन्यातून आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आकस्मिक भेट देणे सक्तीचे करावे . आकस्मिक भेटीत जमिनीवरील वास्तव काय दिसले याचा लेखाजोखा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य असावे .

१०) रुग्ण हा ग्राहक असल्याने त्याला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत येणाऱ्या अनुभवाबाबत फीडबॅक देण्यासाठी  व्यवस्था निर्माण केली जावी  .

 

११) आरोग्य उपकेंद्रे ते महापालिका रुग्णालये या सर्व ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सर्व औषधांची माहिती हि ऑनलाईन पद्धतीने जनतेसाठी खुली असायला हवी .

१२ ) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आर्थिक गैरव्यवहार , भ्रष्टाचाराची जी वाळवी लागली आहे तिला प्रतिबंध घालण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कारभारात मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी अधिकाधिक माहिती तंत्रज्ञानाचा  अवलंब केला जावा .

१३ ) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सर्व कर्मचारी -अधिकारी -डॉक्टर्स यांच्या बदल्या या पूर्णपणे संगणकीय पद्धतीनेच करण्याचा नियम केला जायला हवा . 

 


 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी

संपर्क : ९८६९२२६२७२

ईमेल : danisudhir@gmail.com

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा