THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

जेष्ठसमाजसेवक मा . अण्णा हजारे साहेबांना खुले पत्र





मा . अण्णा हजारे साहेब ,
जेष्ठ समाजसेवक .
                         शि.सा . नमस्कार

विषय : भ्रष्टाचार पश्चात उपाययोजना बरोबरच भ्रष्टाचार पूरक व्यवस्थेवरही  
                प्रहार  हवा !
 
            मा . अण्णाजी , आपल्या सामाजिक योगदानाबद्दल आदर बाळगून आपणाशी संवाद साधत आहे . आपण आगामी काळात "लोकपाल आणि लोकायुक्त कायदा " यासाठी दिल्ली येथे आंदोलन करणार असल्याचे  जाहीर केले आहे .

       अतिशय गरज आहे अशा कायद्याची . आपले समाजातील स्थान आणि आपणास असणारा जनपाठींबा यामुळे सरकार आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करते हे अनेकवेळा अधोरेखीत झालेले आहे . आपल्या आंदोलनात सरकार बदलवून टाकण्याची ताकद असते हे देखील जनतेने अनुभवले आहे आणि सरकारला देखील त्याची जाणीव आहे . सांप्रतकाळी विरोधी पक्ष अस्तित्वहीन झाल्यामुळे सरकारवर जनरेट्याचा दबाव हा देखील काळाची गरज आहे आणि म्हणूनच आपले आगामी आंदोलन स्वागतार्ह आहे याविषयी दुमत संभवत नाही . 




    मा . अण्णाजी , आपल्या समोर एक वेगळा मुद्दा मांडावयाचा आहे आणि त्यासाठी हा पत्रप्रपंच .


        रोगाची कारणे ज्ञात असून देखील त्या कारणांना  प्रतिबंध न करता , रोग होऊ द्यावयाचा आणि तदनंतर रोगपश्चात उपाय योजनांवर भर द्यावयाचा हा व्यवहार्य मार्ग असत नाही . अधिक व्यवहार्य मार्ग म्हणजे रोगास कारणीभूत गोष्टींवर प्रहार करणे , ज्या योगे रोग टाळता येऊ शकेल .  “ PREVENTION IS BETTER THAN CURE”  या अर्थाचा वाकप्रचार हेच सांगतो . त्यामुळेच लोकपाल व लोकायुक्त कायद्यांबरोबरच "भ्रष्टाचार पूरक व्यवस्थेवर प्रहार करणे ' अत्यंत आवश्यक आहे .




सरकार पारदर्शक ; व्यवस्था मात्र भ्रष्टाचारास पूरकच : 

      वर्तमान राज्यातले आणि दिल्लीतले हे  दोन्ही सरकारे 'पारदर्शकतेचे ' खंद्दे पुरस्कर्ते आहेत असे वारंवार सांगितले जाते . परंतू वास्तवात मात्र सरकारला पारदर्शकतेचे वावडेच असल्याचे दिसते . अगदी ग्रामपंचायतीचे उदाहरण घेऊ यात . ग्रामीण भारताच्या विकासाची इंजिने म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था या शुद्ध हेतूने  सरकार विविध योजनांसाठी थेट ग्रामपंचायतींना निधी देते , हा निधी लाखो रुपयांचा असतो . परंतू ग्रामपंचायतींना प्राप्त निधीचा कसा विनियोग होतो हे ज्या नागरिकांसाठी ती योजना राबवली जाते त्यांनाच त्याची माहिती दिली जात नाही . पर्यायाने वर्षानुवर्षे लाखो रुपयांचा निधी मिळून देखील खेडे रस्ते , आरोग्य व्यवस्था , स्वच्छता ,पाणी पुरवठा , पथदिवे यासम मूलभूत गोष्टींपासून वंचीत आहेत . योजना येतात , कागदोपत्री त्यांची पूर्तता होती . योजना येतात , दर्जाहीन पद्धतीने पूर्ण केल्या जातात आणि पुन्हा त्याच त्याच योजनांवर निधी खर्च केला जातो . 


   अण्णाजी , आपणास ज्ञात असेल की , हिच कार्यपद्धती हि पंचायत समिती , जिल्हा परिषदा , नगरपालिका ते थेट महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमी -अधिक प्रमाणात 'चालू ' आहे . स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक ताळेबंद कधीच जनतेसमोर येऊ दिला जात नाही . भ्रष्टाचाराची मुळे या अपारदर्शक व्यवस्थेत आहेत आणि त्यामुळेच या मुळांवर 'पारदर्शक ' घाव घालणे गरजेचे आहे . 


       स्थानिक स्वराज्य संस्था हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले . अपारदर्शक व्यवस्थेने  नगरसेवक -आमदार -खासदार निधीला देखील ग्रासले आहे हे सर्वश्रुत आहे . राज्य आणि केंद्र सरकारच्या बहुतांश योजनांना , कार्यालयांना 'अपारदर्शक व्यवस्थेचे कवचकुंडले ' आहेत आणि त्यामुळे निधीचा गैरवापर , योजनांतील भ्रष्टाचार हे सार्वत्रिक असून देखील ते उघड होत नाहीत . जो पर्यंत गैरप्रकार , भ्रष्टाचार उघड होत नाही तोपर्यंत लोकपाल ,लोकायुक्त कायदे असूनही फायदा संभवत नाही कारण जो पर्यंत तक्रार होत नाही तो पर्यंत कुठलीही यंत्रणा हस्तक्षेप करू शकत नाही . 


    आजवर सर्वाधिक उपाय योजना केली गेली ती गैरप्रकार -भ्रष्टाचार -घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी , परंतू त्याची फलनिष्पत्ती आपल्या सर्वांसमोरच आहे . गैरप्रकार -भ्रष्टाचार- घोटाळ्यांच्या फाईलीच ज्या देशात गायब होतात तेथे " गैरप्रकार पश्चात " कारवाई हा एकमात्र उपाय असत नाही हे एव्हाना सिद्ध झाले आहे . 





       वर्तमान सर्व परिस्थिती लक्षात घेता , गैरप्रकार -भ्रष्टाचार-घोटाळे होणारच नाहीत वा कमीत कमी प्रमाणात होतील या कडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे . त्यामुळेच गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा सर्व कारभार जनतेसमोर "OPEN TO ALL " या पद्धतीने असायला हवा . यावरील दृष्टीक्षेपातील सर्वोत्तम उपाय म्हणजे , " राज्य व केंद्र सरकारांनी आपण जो जो निधी वितरीत केला आहे त्याचा संपूर्ण तपशील आपल्या -आपल्या संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य असावे ". 


   दृष्टिक्षेपातील प्रतिबंधात्मक उपाययोजना :

       अण्णाजी , सांप्रतकाळी व्यवस्था परिवर्तन करण्यास बांधील करण्याची क्षमता केवळ आपल्यातच आहे म्हणून आपण खाली नमूद केलेल्या गोष्टींसाठी लोकपाल लोकायुक्त कायद्यांबरोबरच आग्रही असावे अशी आपणास विनंती आहे . 


  • ·         सर्व स्थानिक संस्थांचा आर्थिक ताळेबंद त्या त्या संस्थांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणे अनिवार्य असावे .

  • ·         राज्य व केंद्र सरकारने आपण वितरित केलेल्या निधीचा संपूर्ण लेखाजोखा पब्लिक डोमेनवर उपलब्ध करावा .

  • ·         भूखंड -जमीन हे भ्रष्ट व्यवस्थेतील सर्वात अग्रगण्य घटक आहेत हे लक्षात घेता सरकारला विविध योजनांतर्गत भूखंड -जमीन वाटप आणि त्यांचे लाभार्थी हि माहिती जनतेसमोर उपलब्ध करणे अनिवार्य असावे .

  • ·         रस्ते -इमारती निर्मिती -दुरुस्ती यावर होणारा खर्च 'मार्केट रेट ' पेक्षा अधिकपट असून देखील सरकारी इमारतींचा दर्जा यथातथाच असतो . मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरतील 'मनोरा ' निवास हे याचे सर्वोत्तम उदाहरण ठरते . याकरीता सरकारी योजनांच्या कामाचे त्रयस्त यंत्रणेकडून ऑडीट , कामाच्या दर्जाची कालबद्ध हमी अनिवार्य असावी

                

                      अर्थातच आपण जी २ दिवसीय बैठक त्यात तज्ज्ञांनी अनेक उपाय योजले असतीलच, त्यात हा खारीचा वाटा . 


                आपल्याला या वयात देखील लढा देण्याची वेळ सरकार आणते हे खरे तर देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.     
   

             धन्यवाद .                                                                             

                                    कळावे ,   आपला



                                                                                       सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,नवी मुंबई . 


                                                                                 ९८६९२२६२७२    danisudhir@gmail.com.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा