आज गणेश विसर्जन . बुद्धीच्या देवतेचे विसर्जन . गेल्या काही वर्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मत .
निर्मितीच्या उद्दिष्टालाच हरताळ
फासणे यात भारतीयांचा हातखंडा आहे हा आपला इतिहास आहे . याचे वर्तमानातील उदाहरण
म्हणजे 'गणेशोत्सव' .
१८९३ ला
लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला त्याची
उद्दिष्टपूर्ती आजच्या गणेशोत्सवात होते आहे का ? याचे उत्तर
सर्वार्थाने नकारात्मकच आहे . का होते आहे असे ? यास समाज म्हणून
कोण जबाबदार आहेत ? या समाजाचा घटक म्हणून आपण उत्सवाच्या बाजारीकरणास
जबाबदार आहोत का ? अगदी साधी गोष्ट पहा . या गणेशोत्सवासाच्या
कालावधीत तलावात प्लास्टिकसह फेकले जाणारे निर्माल्य आपल्या ‘ बुद्धीच्या विसर्जना ’चे तर प्रतीक ध्वनित करत नाही ना ? वर्तमान गणेशोत्सवाची दिशा आणि दशा या
सगळ्याचा 'डोळस ' धांडोळा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न . धार्मिक उत्सव आपल्या संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत त्यामुळे उत्सवांना विरोध असण्याचा प्रश्नच असत नाही , प्रश्न आहे तो उत्सवाच्या विद्रुपीकरणाचा , उत्सवाच्या बाजारीकरणाचा .
एखाद्या गोष्टीचे , व्यवस्थेचे
राजकीय ध्रुवीकरण झाले , बाजारीकरण झाले की त्याची 'मातीच
' होते याची प्रचीती इतिहासातून होतच असते . आज साजरे केले जाणारे
धार्मिक उत्सव जसे दहीहंडी , नवरात्रौत्सव , उरूस , धार्मिक
मिरवणुका , गणेशोत्सव पाहता 'धार्मिकतेच्या
प्रमुख हेतूवर ' कुरघोडी होते आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये
.
परमेश्वराला सर्वांचा मालक समजतात
परंतु आजच्या प्रगत (?) युगात मनुष्य"प्राणी " हा
परमेश्वराचाही 'मालक ' होताना दिसतो
आहे . अनेक मंदिरे , धार्मिक उत्सव हे 'अमुक-तमुक
' च्या नावाने ओळखले जातात .अमुक -तमुकची दहीहंडी ,यांचा
-त्यांचा गणपती , अमुक
-तमुकचे शंकर मंदिर हे प्रातिनिधिक
उदाहरणे . आपण " मालक " झाल्याच्या वृतीतूनच लालबागसारख्या विविध
राजाच्या दरबारात दिसणारी दबंगगिरी जन्मास येते .
एकीकडे धार्मिकता (?) वाढते आहे असे चित्र उभे राहत असताना
समजातील नैतिकतेचे मात्र अध:पतन होते आहे , हे विरोधाभासी
चित्र 'धार्मिकतेचे बेगडीपण ' अधोरेखित करते . मंदिरांच्या ठिकाणी
सोने-चांदी - रुपये सढळ हाताने दान करणारे हात मात्र माणसातले देवपण जपण्यासाठी
आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या समाजसेवी संस्थाना 'हात' देताना
मात्र का थरथरतात हे अनाकलनीय आहे .
उत्सवांच्या मूळ हेतुंचेच विसर्जन :
गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत आणि
सकृत दर्शनी हि आशादायक व आनंदाची बाब आहे . धार्मिक उत्सवांचे मुख्य प्रयोजन
हे सामाजिक प्रबोधन , नैतिक
मूल्यांचे बीजारोपण , संस्कृतीचा
व्यापक स्तरावर प्रचार -प्रसार , सामाजिक एकात्मतेच्या भावनेचे जतन आणि संवर्धन
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात काही विरंगुळ्याचे क्षण
ईत्यादी असते . वर्तमान सार्वजनिक उत्सव यापैकी किती
उदिष्टपूर्ती करतात या प्रश्नांचे 'डोळस
' उत्तर
दुर्दैवाने बहुतांश पातळीवर नकारात्मकच आहे .
उलटपक्षी जसजशी उत्सवांच्या संख्येत
आणि प्रमाणात वाढ होते आहे तसतशी त्यांचे तोटे अधिक प्रमाणात जाणवू लागले आहेत .
ध्वनीप्रदूषण , जलप्रदूषण
, रस्ताबंदी
-नुकसान , खंडणीसदृश्य
वर्गणी या बरोबरच सार्वजनिक उत्सवांना लागलेले आणखी एक ग्रहण म्हणजे " अधिकृत
वीजचोरी ". या उत्सवांसाठी थेट विजेच्या डीपीतून-पोलवरून उघड उघड वीज चोरी हा
' सरकारमान्य
हक्कच ' आहे
अशा प्रकारे विजेची उधळपट्टी चालू असते .
मुळात आपल्याकडे ' धर्माचे ' लेबल लावले की , सर्व कायदे -नियम गुंडाळून ठेवले जाऊ
शकतात अशी सार्वत्रिक धारणा झाली आहे आणि त्यामुळेच उत्सवांना हिडीस रूप येताना
दिसते आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे वर्तमान उत्सवांना ' धार्मिक उत्सव ' संबोधणे कितपत न्यायपूर्ण आहे .
अर्थातच आजही काही सार्वजनिक मंडळे आहेत की जे सार्वजनिकतेचे भान जपत
असतात . पण अशी मंडळे अपवादानेच आढळतात . हे दुर्दैव्य
बुद्धीच्या
देवतेच्या पायाशी 'निर्बुद्धांची ' गर्दी :
मुळातच ३० तास एका विशिष्ट ठिकाणच्या
देवताच्या दर्शनासाठी उभे राहणाऱ्यांना श्रद्धावान समजने हे 'परमेश्वर
सर्वत्र असतो ' या मूळ तत्त्वाला हरताळ फासणारे आहे .
विशिष्ट
ठिकाणचा गणपती हा नवसाला पावतो हि धारणा इतर ठिकाणच्या गणपतीच्या अस्तित्वावर
प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत नाही का ? ज्यांच्या
नवसाला पावला त्यांनी नवस फेडायचा तर प्रश्न हा राहतो कि ज्यांना पावला नाही
त्यांनी काय खटले भरावयाचे का ? जो या पृथ्वीच्या निर्माता आहे त्याला 'अमुक
होऊ दे , मग तमुक करीन' हा अधिकार मानवाला कसा प्राप्त होतो ?
देवाला
सर्व ज्ञात असते असे म्हणतात तोच देव लाच -भ्रष्टाचार -काळे धंदे यातून मिळवलेल्या
पैशाचे दान देणाऱ्याला कसा पावतो ? चोरून वीज वापरणाऱ्या , देवाच्या
आगे-मागे जुगार खेळणाऱ्या , आगमन-विसर्जन मिरवणुकीत 'अमृत'
प्राशन
करून बेधुंद नाचणाऱ्या भक्तांना बुद्धीचा देव सदबुद्धी का देत नाही याचे उत्तर
धर्मपंडित देणार का ? राजकारणी आणि सेलिब्रिटी यांना मिळणारी 'विशेष
' वागणूक परमेश्वराच्या दारातही 'माणूस ' समान नाही हेच दर्शविते ना ? अशावेळी वेगळी
रांग ठेवण्यापेक्षा वेगळी मंदिरे ठेवणे जास्त सयुंक्तिक असणार नाही का ? यासम
अनेक प्रश्नाची उत्तरे प्रतीक्षित आहेत .
उत्सवांच्या बाजारीकरणात
प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा :
धार्मिक उत्सवाचे ' इवेन्ट
' करण्यात प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा आहे . खासकरून वृत्त
वाहिन्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करायला हवे.
सुदैवाची गोष्ट हि कि अलीकडच्या काळात अनेक नागरिकांना भान आल्यामुळे धार्मिकतेच्या (?) नावाखाली
चालणाऱ्या या दुकानापासून त्यांनी फारकत घेतली आहे . अनेक गणेश मंडळाचे मंडप ओस
पडलेले दिसत होते .(वर्गणी देणे म्हणजे सहभाग नव्हे !) होय ! नास्तिक म्हणून
आपण उपरोक्त विचारांना स्वार्थापोटी दूर
करू शकू ! परंतु ‘ अंध
आस्तिक ’ असण्यापेक्षा 'डोळस नास्तिक'
असणे निश्चितच उत्तम ठरू शकते . स्पष्ट विचारांना 'नास्तिकतेचे
' लेबल लावणाऱ्याना एक प्रश्न अगदी विनम्रपणे विचारावासा वाटतो की नवरात्र उत्सवानंतर प्रचंड वाढणारे 'गर्भपाताचे
‘ प्रमाण कोणती धार्मिकता ध्वनित करते ?
तात्पुरत्या मंडपांचे जेंव्हा कायम स्वरुपात रुपांतर होऊन त्याच अनधिकृत ठिकाणावर त्या विभागाच्या '
राजाचे
' ( मंदिर उभारणारा स्थानिक नेता 'राजाच ' असतो त्यामुळेच कदाचीत देवालाही त्या
त्या विभागाचा राजा संबोधण्याची प्रथा दिसते ) मंदिर कायमस्वरूपी मंदिर उभा राहत असेन तर ते योग्य
आहे का ? अन्य कू
-प्रथांवर अनेकवेळा चर्चा होत असते परंतु नेते आणि सरकारच उत्सव प्रिय असल्यामुळे
वर्षानुवर्षे कायदे पायदळी तुडवली जात आहेत .
" सार्वजनिक उत्सव "
संबोधने कितपत रास्त ? :
उत्सव सार्वजनिक आणि धार्मिक असतो ना ? मग
गणपती -देवीचा फोटो एका कोपऱ्यात टाकून काही मंडळींचा स्वतःचे फोटो मिरवणाऱ्या
फ्लेक्सचा अट्टाहास कशासाठी ? स्वतःची प्रसिद्धी न करता कराना
धार्मिक उत्सव साजरे ! त्या त्या विभागातील केवळ ५-१० मंडळींच्या ताब्यात असणाऱ्या
उत्सवांना सार्वजनिक म्हणून संबोधणे हाच मुळात दांभिकपणा दिसतो
.
मुळात एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली
की तेच सत्य वाटू लागते . या उत्सवांच्या
बाबतीतही काहीसे तसेच होताना दिसत आहे . विद्यमान उत्सव ' धार्मिक '
आहेत
, ते 'सार्वजनिक ' आहेत ; ते
लोकाग्रहास्तव साजरे केले जातात , ते
समाज प्रबोधनासाठी आहेत वगैरे
वगैरे … आज ज्या विकृत पद्धत्तीने उत्सव साजरे केले जातात ते पाहता उपरोक्त
उल्लेखित गोष्टींची ते पूर्तता करतात का
हा खरा प्रश्न आहे .
एक गोष्ट अगदी
स्पष्ट आहे कि एकूणच गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंतची सद्यस्थिती पाहता लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवाचे विसर्जन होते
आहे ? असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरणार नाही .
सार्वजनिक
धार्मिक उत्सवांना ' वीजचोरीचे ' ग्रहण
:
मुंबई व उपनगरात जवळपास १४ हजार छोटी -मोठी गणेश मंडळे असल्याचे
समजते , पैकी ६००० हजार मोठी मंडळे आहेत . ३
वर्षांपूर्वी माहिती अधिकारातून प्राप्त माहिती नुसार केवळ २० टक्के
मंडळानी तात्पुरत्या स्वरुपाची वीजजोडणी घेतल्याचे दिसते . १० दिवस विजेची
मुक्तहस्ते उधळण करूनही अनेक मंडळांचा वीजवापर ५०/१०० युनिट असल्याचे दिसते . अनेक नामवंत ' राजे ' देखील
वीजचोरीत समाविष्ट असतात . जनरेटर
व्यवस्था केवळ दिशाभूल करण्यासाठी असते . गैर ते गैरच . त्यामुळे धार्मिक उत्सव मग तो कोणाचाही का असेना , भावनिक लेबले लावून सर्रास होणाऱ्या वीजचोरीला प्रतिबंध घातलाच
गेला पाहिजे . शेवटी चोरून वापरलेल्या विजेचा भार
ग्राहकांवर टाकला जातो हे थांबायलाच हवे .
स्व-प्रसिद्धसाठी उत्सवांचा वापर : जर
राज्यातील सर्व जनतेचे ' मत ' लक्षात घेतले तर
एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की , किमान ८० टक्के नागरिकांना या
उत्सवांशी काहीही देणे घेणे नसते . उत्सवांची खरी गरज वाटते ती नेत्यांना आणि
त्यांच्या बगल बच्चांना . सर्व पक्षीय नेत्यांची जनतेशी थेट नाळ तुटली आहे .
कुठलाही नेता जनतेचे कामे करून प्रकाशझोतात येऊ पाहत नाही आणि त्यामुळे त्यांना
झळकण्यासाठी अशा उत्सवांची गरज पडते . उतसावांच्या निमित्ताने फलकबाजी करत आपला
चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी सर्व धडपड चालू असते .
शेवटी , या
सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची “श्रीगणेशाला ” प्रार्थना
आहे की , उत्सवासाठी देव पाण्यात ठेऊन असणाऱ्या सर्व राजकीय पक्ष , सर्व धर्मीय संत -महात्मे -मुल्ला
-मौलव्वी , स्वतःला धार्मिक उत्सवांचे तारणहार समजणारे
नेते , त्यांच्यासाठी आपला जीव ओतणारे , " शुद्ध हरपून
" कामे करणारे कार्यकर्ते , सध्या
उत्सवाच्या विकृतीकरणावर चर्चा करणारी आणि योग्य
वेळ येताच त्याचे लाईव्ह प्रसारण करणारी प्रसारमाध्यमे या सर्वांना
सुबुद्धी दे .
समाधानाची व आशादायक गोष्ट म्हणजे गेल्या २/३ वर्षात उपरोक्त परस्थितीत हळू हळू का होईना सकारात्मक बदल होत आहेत .
तळटीप
: या लेखाचा उद्देश हा उत्सवाच्या उद्दिष्टपूर्तीचे सिंहावलोकन हा असून 'धार्मिक भावना 'दुखावणे हा नाही .
सुधीर
लक्ष्मीकांत दाणी 9869226272 danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा