THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

मतदारांची जागरूकताच लोकशाहीची क्रूरचेष्टा थांबवू शकते ...


                  सध्या राजकारणात जे पक्षांतरे  'चालू ' आहे त्यास केवळ आणि केवळ लोकशाहीची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल . त्यास धूर्त राजकारण ,चाणक्य नीती , कालसुसंगत तडजोडी अशी गोंडस नावे दिली जात असली तरी वर्तमानातील 'चालू ' प्रकार म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रकार ठरतो .
     भले ही  अशा 'चालूपणा ' मुळे एखाद्या राजकीय पक्षास यश मिळेल ,सत्ता मिळू शकेल पण त्यातून लोकशाहीच्या अस्तित्वास , मतदारांच्या विश्वासास नख लागले जात आहे आणि हा अतिशय गंभीर प्रकार आहे .

       " स्वार्थ .. स्वार्थ आणि स्वार्थ " हाच भारतातील सर्व राजकीय व्यक्ती -पक्षाचे ध्येय आहे हेच गेल्या काही दिवसातील घाऊक पक्षांतरावरून अधोरेखीत होते
    विधिनिषेधशून्य राजकारणाचा वीट आला आहे आणि त्यामुळे भारतात कुठल्याही राजकीय पक्ष 'पार्टी विथ डिफरंन्स ' नाही हे पुन्हा पुन्हा दिसून येते आहे . 


    अर्थातच यास केवळ राजकीय व्यक्ती ,पक्ष जबाबदार आहेत असे म्हटले तर ती स्वतःचीच फसवणूक ठरू शकते कारण यास राजकरण्या इतकेच भारतीय मतदार देखील जबाबदार आहेत .
    'सुज्ञ मतदारहा लोकशाहीचा पाया असतो आणि तोच पाया आज ढिसूळ झालेला असल्यामुळे भारतात लोकशाही खऱ्या अर्थाने रुजू शकली नाही . नागरीकांचा कुठल्याच राजकीय पक्षाला धाक उरलेला नसल्यामुळे जनतेचा विरोध डावलून 'माहिती अधिकार दुरुस्ती ' सारखे निर्णय जनतेवर लादले जाताना दिसतात .
   एखादी गोष्ट सातत्याने घडत गेली की  त्यावर जनतेचा विश्वास बसतो या नियमानुसार स्वातंत्र्योत्तर काळात सर्वच नेते , मंत्री , राजकीय पक्ष जनतेची दिशाभूल ,फसवणूक करताना दिसतात आणि त्यामुळेच 'राजकारण हे असेच असते ,,राजकीय मंडळी देखील अशीच असतात हे नागरीकांनी गृहीत धरले आणि नेत्यांनी मतदारांना गृहीत धरलेले असल्यामुळे लोकशाहीचे अध:पतन होते आहे 

  .  भारताचे आणखी एक दुखणे म्हणजे गल्ली पासून दिल्ली पर्यंत प्रत्येक जण दुसऱ्याला सुधारावयाचा प्रयत्न करत असतो . वास्तवात कुठलाही अपेक्षीत  स्वप्नपूर्ती साठी खरी गरज असते ती सर्वप्रथम स्वतःत बदल करण्याची . आणि आता वेळ आली आहे ती आधी मतदारांनी बदलण्याची व त्यातून राजकीय व्यक्ती व पक्षांना बदलवण्याची .

      का वागतात हि राजकीय मंडळी इतक्या निर्ढावल्यासारखे ? याचे एकमेव आणि एकमेव उत्तर आहे 'देशातील अंध मतदार , व्यक्ती -राजकीय पक्षांचे अंध भक्त ' . या आंधळ्या मतदारांमुळेच लोकशाहीसमोर अंधार निर्माण झाला आहे .

 सध्या जे काही चालू आहे तो आहे 'लोकशाहीचा खून '. कुठलाही मतदार जेंव्हा निवडणूकीत आपले मतदान करत असतो ते त्या राजकीय पक्षांचे ध्येय धोरणे पाहून .  उमेदवाराला , राजकीय पक्षाला नाकारत असतो ते देखील त्या व्यक्तीचे ,पक्षाचे ध्येय -धोरणे-कार्यसंस्कृती पाहूनच . त्यामुळे ज्या व्यक्तींना , पक्षाला मतदारांनी नाकारले आहे त्याच व्यक्तींना ज्या पक्षाचे सध्या मार्केट जोरात आहे त्या पक्षाने आयात करून निवडणुकीत मतदान मागणे व मतदारांनी अशा मागणीला भीक घालत केवळ पक्षाचे चिन्ह पाहून अंधपणे मतदान करणे हा लोकशाहीचा खूनच ठरतो  .
    मतदार राजा जागा हो ! डोळस हो !! सुज्ञ हो !!! लोकशाही भारतात खऱ्या अर्थाने रुजवायची असेल , व्यक्तीशाही , पक्षशाहीला गाडावयाचे असेल तर  मतदारांनी स्वतःला बदलवणे गरजेचे आहे . 
     भविष्यात निर्धांर करणे गरजेचे आहे की , मी जात -पात -धर्म -गावकी -भावकी -पक्ष  यासम गोष्टींच्या आहारी जाणार नाही , भावनेने मतदान करणार नाही . 

   ज्या व्यक्ती सातत्याने केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी , आपली काळी संपत्ती शाबूत ठेवण्यासाठी , आपल्या गैरकृत्यांना अभय मिळण्यासाठी पक्षांतर करतात त्यांना मतदान करणार नाही व त्याच बरोबर 'आयाराम -गयाराम 'संस्कृतीला खतपाणी घालणाऱ्या पक्षाला देखील धडा शिकवील व भविष्यात मतदारांना गृहीत धरून राजकरण करणाऱ्याला चपराक बसेल अशाच प्रकारे मतदान करेल अशी शपथ घेणे काळाची गरज आहे .

       नेते मंडळी जनहिताची ,लोकसेवेची शपथ घेतात पण त्या शपथेचा अंगीकार करत नाहीत . यावर मात करण्यासाठी भारतीय मतदारांनी आपले 'मत ' या लोकशाहीतील सर्वात प्रभावी आयुधाचा वापर करायला हवा .  केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला मतदान करावयाचे नाही हा वजरनिर्धार प्रत्येक मतदाराने करत ,अगदी ग्रामपंचायती पासून याची अंमलबजाणी करायला हवी .
    जो पर्यंत भारतीय मतदार जागा होत नाही , निवडणुकीतील मतदानाचा सुयोग्य पणे  वापर करत नाही  तो पर्यँत कुठलाही पक्ष सत्तेत आला तरी नागरीकांच्या आयष्यात बदल घडणार नाही हे नागडे सत्य आहे . 
    केवळ सोशल मीडियावर राजकीय मंडळींवर आगडपाखड करून , माध्यमातून त्यांना दोष देऊन काहीच फरक पडणार नाही कारण सर्वच राजकीय पक्षांनी आजवरच्या अनुभवातून मतदारांना गृहीत धरलेले आहे .
    राजकीय पुढारी ,नेतृत्व -पक्षांच्या जनतेला गृहीत धरण्याचा प्रवृत्तीला जो पर्यंत चपराक दिली जात नाही , स्वातंत्र्यतोत्तर केवळ वर्षांची वाढ होत जाईल , जनतेच्या जीवनदर्जात मात्र वाढ होणार नाही .  चला ! आधी आपण बदलू यात ! जनतेला गृहीत धरून होणारी लोकशाहीची वाट  आपोआप बदलेल .

             अर्थातच आपण बदलवून आपण राजकीय पक्षांना देखील बदलण्यास भाग पाडू शकतो . जे काही बोटावर मोजता येतील अशी राजकारणातील संवेदनशील मंडळी आहेत त्यांना एकच आवाहन आहे की , एखाद्या पक्षाच्या बॅनरखाली निवडून आल्यानंतर त्या व्यक्तीला किमान त्याचा त्या निवडणुकीतील कालावधी संपत नाही तोपर्यंत 'पक्षांतर ' करता येणार नाही, अशा नियमासाठी आग्रह धरा  .

 निवडून आल्यानंतर पक्षांतर करणे हा त्या त्या मतदारांच्या विश्वासाचा खूनच आहे . एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या व्यक्तीला त्या त्या पक्षात गेल्यानंतर किमान ५ वर्षाचे सदस्यत्व पूर्ण केल्यानंतरच निवडणूक लढवता येईल असा कायदा करणे गरजेचे आहे . त्यासाठी देशात परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या सामाजिक संघटनांनी न्यायालयीन लढाई लढणे नितांत आवश्यक आहे . भारतीय निवडणूक प्रक्रिया शुद्ध झाली की  देश आपोआप बदलेल . देशातील अनागोदीचे प्रमुख कारण हे 'सदोष निवडणुका ' आहे व त्यात बदल व्हायलाच हवा . या सर्व बदलासाठी मतदारांनी बदलणे गरजेचे आहे . राजकारणातील 'अर्थपूर्ण ' घाऊक आयात -निर्यात थांबवायची असेल तर पक्षांतर करणाऱ्यांना निवडूनच देऊ नका . जे नागरीक  म्हणून तुमच्या हातात आहे ते करा , केवळ दुसऱ्या कडून बदलाची अपेक्षा करणे हे स्वतःचीच फसवणूक ठरते .
            खरे तर हा मुद्दा जनता व देशहिताच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे म्हणून देशहितासाठी  लढणाऱ्या संघटनांनी या संदर्भात न्यायालयात जनहित याचिका टाकणे काळाची गरज ठरते .पण सर्वात महत्वाचा आणि आपल्या हातात असणारा मार्ग म्हणजे .. लोकशाहीचा खून टाळण्यासाठी मतदारांनी स्वतः 'जागृत ' होण्याची गरज आहे ..


सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई . ९८६९ २२ ६२ ७२ danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा