गणराज्य
दिनी राजपथावर सादर झालेल्या पथसंचलनात " महाराष्ट्राचे ' सोंगी मुखवटे
' लोकनृत्य
प्रथम " हे लोकसत्तातील वृत्त वाचून झालेला आनंद क्षणिक ठरला . त्याला कारण ठरले ते लोकसत्ता मुखपृष्टावरील
अश्न्विनी जोशी यांच्या संभाव्य बदलीचे वृत्त . हे दोन्ही वृत्त वेगवेगळे असले तरी
नाटकातले ' सोंगी
मुखवटे ' आणि राजकारणात 'प्रामाणिक
मुखवट्याचे सोंग '
करणारी मंडळी हे दोन्ही महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत याची खात्री
या दोन्ही वृत्तातून झाली . या संभाव्य बदली मागे भाजप खासदार -आमदारांचा पुढाकार असल्याचे
म्हटले आहे . विद्यमान सरकारचा प्रामणिकता - पारदर्शकता हा मूलमंत्र आहे आणि त्याची
वाच्यता गल्ली पासून -दिल्ली पर्यंत भाजप नेते करत असतात . सरकारचे " काम " जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या राज्य
शासनाच्या जाहिरातीत देखील " प्रामाणिक -पारदर्शक -गतिमान " सरकार असा ठळक
उल्लेख असतो . या पार्श्वभूमीवर एक प्रश्न निर्माण होतो तो हा की , जे जनतेला
दाखवून देण्यासाठी आटापिटा केला जातो ते पक्षाच्या आमदार -खासदारांना सांगितले जात
नाही का ? सांगितले
जात असेन तर ते त्यांना कळते का ? मान्य असते का ? अर्थातच याचे
उत्तर ' हो
' असेन तर एखाद्या प्रामाणिक जिल्हाधिकाऱ्याच्या एका वर्षात
बदलीचा घाट का घातला जातो ? हे सामान्य
नागरिकांच्या आकलना पलीकडे आहे आणि त्यानंतर
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की , जर सरकार मधील प्रतिनिधींनाच ' प्रशासनातील
प्रामाणिकता -पारदर्शकता ' नको असेन तर सरकारचा पारदर्शक -प्रामणिकतेचे "सोंगी मुखवटे
" धारण करण्याचा अट्टाहास कशासाठी ?
नुकताच आपण ६७
वा प्रजासत्ताक दिन साजरा केला . गेले ६ दशके , सत्तेवर असणारे
प्रत्येक सरकार ,प्रत्येक
मुख्यमंत्री स्वच्छ -पारदर्शक प्रशासनाचा दावा करताना दिसतात . असे असताना पायाभूत
सुविधा , जनकल्याणकारी योजना यावर काही लाख करोडो रुपये खर्चून देखील आज
हि रस्ते -वीज -पिण्याचे पाणी -सुदृढ आरोग्य व्यवस्था -' गळती ' नसणारे शिक्षण यासम सुविधांची वानवा का आहे ? निधी कुठे
मुरतो ? या
सर्वांचे एकच उत्तर दिसते ते म्हणजे शासन -प्रशासनातील " ढोंगी मुखवटे
" . जनतेला सर्व ज्ञात आहे . प्रजा एकीकडे तर सत्ता दुसरीकडे या गेल्या ६ दशकातील
वाटचालीमुळे जनतेला या सर्वाची सवय झाली आहे. मामला थंड झाल्यावर तांत्रिक बाजू पुढे करत अश्विनी
जोशींना बढती -बदली दिली जाईल . प्रश्न केवळ एका जिल्हाधिकाऱ्यापुरता मर्यादीत नाही
. प्रश्न आहे प्रामाणिकता अंगी बाळगणे हे प्रशासनात दुर्गुणच ठरतो हे अनुभवातून कळून
देखील काही व्यक्ती ती वाट सोडत नाही अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना जाणाऱ्या संदेशाचा . पूर्वीच्या काही सरकारबाबत
जनतेने काही कृत्य गृहीतच धरलेली होती त्यामुळे जनतेचा अपेक्षाभंग होत नव्हता . राज्यातील
-केंद्रातील भाजपा सरकारने स्वत:च जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत . त्यामुळे अपेक्षाभंग
होणार नाही याची काळजी लोकप्रतिनिधीनी घेणे अत्यंत आवश्यक आहे . वारंवार सरकारच्या
कृतीतून जनतेचा अपेक्षाभंग होत गेला तर प्रामाणिक मुख्यमंत्री -प्रामाणिक पंतप्रधान
या अफवाच ठरतील . हे सारे जनहितासाठी घडू नये
या साठी हा पत्रप्रपंच .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा