THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ३० जून, २०१५

मा. न्यायालयाने सार्वजनिक धार्मिक उत्सवातील वीजचोरीचा मुद्दा देखील लक्षात घ्यावा


     मा. उच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने रस्त्यावरील मंडपाबाबत निश्चित धोरण 
ठरविण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत . न्यायालयाच्या निर्णयाचे सुशिक्षीत -सुसंकृत नागरीक नक्कीच स्वागत करेल . विरोध असणार आहे तो उत्सवाच्या नावाखाली धांगडधिंगा घालणाऱ्या तथाकथीत मंडळांचा प्रसिद्धीची पोळी भाजून घेणाऱ्या गल्लोगल्लीतील नेते , वर्गणीच्या नावाखाली खंडणी करणाऱ्या गुंडांचा आणि तत्सम वेगवेगळे स्वार्थी मंडळीचा .

      मुळात आपल्याकडे ' धर्माचे ' लेबल लावले की , सर्व कायदे -नियम गुंडाळून ठेवले जाऊ 

शकतात अशी सार्वत्रिक धारणा झाली आहे आणि त्यामुळेच उत्सवांना हिडीस  रूप येताना दिसते 

आहे . सर्वात आधी मा . न्यायालयाच्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यावर आणि वृत्तपत्रातून धार्मिक उत्सवाच्या अस्तित्वाच्या नावाने गळे काढणाऱ्या सर्वपक्षीय प्रतिनिधी , मंडळ समितीचे प्रतिनिधी यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे . ना याचिका कर्त्याने , ना मा . न्यायालयाने उत्सव बंदीवर भाष्य केले आहे त्यामुळे उगीचच मुख्य मुद्याला बगल देत वावड्या उडवू नये . मुख्य आक्षेप आहे तो " सार्वजनिक उत्सवांच्या स्वरूपाला , साजरीकरणाला.  "

     उत्सव सार्वजनिक आणि धार्मिक असतो ना ? मग गणपती -देवीचा फोटो एका कोपऱ्यात टाकून काही मंडळींचे स्वतःचे फोटो मिरवणाऱ्या फ्लेक्सचा अट्टाहास कशासाठी ? स्वतःची प्रसिद्धी न करता कराना धार्मिक उत्सव साजरे ! त्या त्या विभागातील केवळ ५-१० मंडळींच्या ताब्यात असणाऱ्या उत्सवांना सार्वजनिक म्हणून संबोधणे हाच मुळात दांभिकपणा दिसतो . 



     सर्वात महत्वाचे  म्हणजे वर्तमान उत्सवांना ' धार्मिक उत्सव ' संबोधणे कितपत न्यायपूर्ण आहे . नवरात्र उत्सवानंतर अविवाहित मुलींच्या गर्भपाताचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते (?) हे जर वास्तव असेल तर धार्मिकतेची परिभाषा पुन्हा एकदा तपासून पहावी लागेल . तात्पुरत्या मंडपांचे जेंव्हा कायम स्वरुपात रुपांतर होऊन  त्याच अनधिकृत ठिकाणावर त्या विभागाच्या ' राजाचे ' ( मंदिर उभारणारा स्थानिक नेता राजाच असतो त्यामुळेच कदाचीत देवालाही त्या त्या विभागाचा राजा संबोधण्याची प्रथा दिसते ) मंदिर  कायमस्वरूपी मंदिर उभा राहत असेन तर ते योग्य आहे  का ? अन्य कू -प्रथांवर अनेकवेळा चर्चा होत असते परंतु नेते आणि सरकारच उत्सव प्रिय असल्यामुळे वर्षानुवर्षे कायदे पायदळी तुडवली जात आहेत .

        याच सार्वजनिक उत्सवातील ' उघड उघड वीजचोरीची काळी बाजू समोर येणे गरजेचे वाटते. मुंबई व उपनगरात  जवळपास १४ हजार छोटी -मोठी गणेश मंडळे असल्याचे समजते , पैकी ६००० हजार मोठी मंडळे आहेत . गत वर्षी माहिती अधिकारातून प्राप्त माहिती नुसार केवळ २० टक्के मंडळानी तात्पुरत्या स्वरुपाची वीजजोडणी घेतल्याचे दिसते . १० दिवस विजेची मुक्तहस्ते उधळण करूनही अनेक मंडळांचा वीजवापर ५०/१०० युनिट असल्याचे दिसते .  अनेक नामवंत ' राजे ' देखील वीजचोरीत समाविष्ट असतात .  जनरेटर व्यवस्था केवळ दिशाभूल करण्यासाठी असते . वीजमंडळ कर्मचार्यांच्या उदार धोरणामुळे बहुतांश ठिकाणी वीज अनधिकृत परंतु अतिशय उघडपणे वापरली जाते . नंतर हा बोजा अर्थातच सामान्य नागरिकांच्या माथी मारला जातो . गैर ते गैरच . त्यामुळे धार्मिक  उत्सव मग तो कोणाचाही का असेना ,   भावनिक लेबले लावून  सर्रास होणाऱ्या वीजचोरीला प्रतिबंध घातलाच गेला पाहिजे . मा . न्यायालयास विनंती आहे की , धार्मिक उत्सवाबाबत निर्देश देताना वीज चोरीच्या मुद्याही लक्षात घ्यावा .

     शेवटी अतिशय नम्रपणे नमूद करावेसे वाटते की , सार्वजनिक उत्सव मानवी जीवनाचा 

अविभाज्य अंग आहे त्यामुळे त्यास विरोध असण्याचा प्रश्नच उदभवत नाही , विरोध आहे  तो 

उत्सवांच्या विद्रूप -विकृत साजरीकरणाला आणि त्यातून समाजाला तोंड द्याव्या लागणाऱ्या अनिष्ट 

गोष्टींना .

ता क़ : प्रसारमाध्यमातून चर्चा करताना धर्माचा ठेका घेतलेल्या मंडळींनी याचिका कर्त्याचा उल्लेख सन्मानानेच करावा . याचिका कर्ता एक डॉक्टर आहेत हे विसरू नये .
 
                                                                                                सुधीर ल . दाणी , बेलापूर , नवी मुंबई .

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा