THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १६ जून, २०१५

“लढा " पारदर्शक व्यवस्थेसाठी " अंतर्गत निवेदन ”


                          “लढा " पारदर्शक व्यवस्थेसाठी " अंतर्गत निवेदन

                               (AN APPEAL BY CITIZEN FOR TRANSPARENT SYSTEM)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रती ,
मा देवेंद्र फडणवीस साहेब ;
मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य .
विषय : वर्तमान अपारदर्शक व्यवस्थेत  स्थानिक स्वराज्य संस्थात मतदान म्हणजे लुटीचे सूत्र कोणास द्यावयाचे यावरील शिक्का मोर्तबच
महोदय ,
     स्थानिक स्वराज्य संस्थातील भ्रष्टाचाराइतके स्पष्ट , उघडे -नागडे भ्रष्टाचाराचे अन्य अधिकृत उदाहरण सापडणे दुर्मिळच . ग्रामपंचायत ते महानगरपालिका यांच्यामधील भ्रष्टाचार हा सर्वज्ञात आहे. ग्रामसेवक ते मंत्रालय या बाबतीत खात्री देऊ शकतात  त्यामुळेच यास " पारदर्शी भ्रष्टाचार " असे संबोधले तर वावगे ठरणार नाही .
     आपण प्रत्येक वेळी पारदर्शक -स्वच्छ प्रशासनाचा मंत्रजाप करत असतात त्यामुळेच पारदर्शकता हाच भाजपच्या राज्य आणि केंद्रातील वर्तमान सरकारचा आत्मा असल्याचा आम्हा नागरिकांचा समज आहे . या सर्व
' पारदर्शक ' पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थातील ' पारदर्शक ' भ्रष्टाचाराविषयी आपण अनभिज्ञ असला असे वाटत नाही . मग प्रश्न हा उरतो की ज्ञात असून देखील आपल्या सरकारचा याकडे कानाडोळा कसा ? आणि कशासाठी ? या सम प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा पत्रप्रपंच . 
       आपण नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रचार सभेत भ्रष्टाचाराची चौकशी करू असे म्हटले होते . कदाचीत चौकशी होईलही (?) परंतु मुळात प्रश्न हा आहे  भ्रष्टाचाराला पूरक व्यवस्था का ठेवली जाते ? आज दर्जाची तपासणी करणारी कुठलीही स्थायी यंत्रणा नाही . प्रशासनावर त्रयस्थ अंकुश नाही . अधिकृत भ्रष्टाचार हाच या यंत्रणांचा स्थायीभाव बनला आहे . भ्रष्टाचारास पूरक असणाऱ्या वर्तमान प्रशासनात आमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे .
        ग्रामपंचायत निधीचा वापर कसा केला जातो हे सदस्या व्यतिरीक्त अन्य कोणाच्याही गावी नसते . तेच ५ ते ५० लाखापर्यंत प्राप्त  नगरसेवक निधीच्या बाबतीत लागू पडते . आपल्या प्रभागात वारंवार दुरुस्त केल्या जाणाऱ्या पदपथावर किती आणि किती वेळा खर्च केला जातो  याविषयी नागरीक पूर्णतः अनभिज्ञ असतात . कदाचीत ब्रिटीश काळात यापेक्षा अधिक पारदर्शकता असावी . स्वातंत्र्याच्या ६ दशकानंतर हि अवस्था कशाचे द्योतक समजायचे हा खरा संशोधनाचा विषय आहे . राज्य आणि केंद्र सरकारच्या पारदर्शक प्रशासनाचे कृतीशील प्रतिबिंब सामाजिक व्यवस्थेचा कणा असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात का उतरत नाही ? हा खरा सतावणारा प्रश्न आहे .
         घटनेने नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे आणि त्याचा वापर करणे हे माझे परमकर्तव्य आहे याची मला जाण आहे परंतु केवळ निवडणुकीत मतदानाचा अधिकार म्हणजे लोकशाही नव्हे ना ? गेल्या काही वर्षात ग्रामपंचायत ते महानगरपालिका पर्यंतच्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थातील अनियंत्रित--अनियोजित आणि अपारदर्शक "   कार्यपद्धत्तीमुळे या संस्था स्थापनेच्या उद्दिष्ट्पुर्तीपासून कोसो दूर जात असल्यामुळे  त्यांना शब्दशः "लुटीचे स्वरूप " आले आहे . ब्रिटिशांनाही लाजवेल अशी लुट चालू आहे मान्यायालयांनीही यावर अनेकवेळा ताशेरे ओढली आहेत . प्रसारमाध्यमांनीही या संस्थांमधील अनागोंदी , भ्रष्टाचार यावर प्रकाशझोत टाकला आहे परंतु परिस्थिती अधिकाधिक गंभीर होते आहे . झाले ते पुरे झाले ! अशी आता आम्हा जनतेची धारणा आहे .
      जनतेसाठीच  असणाऱ्या या संस्थातील अपारदर्शक कार्यपद्धत्तीमुळे जनतेच्या नाकावर टिच्चून जनतेच्याच करोडो रुपयांच्या निधीचा अपव्यय केला जातो आहे . आम्ही नागरीक हतबल आहोत . हे थांबणार का ? आणि थांबणार असेल तर कधी ? हा आता खरा आमचा प्रश्न आहे . केवळ मतदानापुरती संकुचित लोकशाही हि एक प्रकारच्या 'हुकुमशाहीचेच ' स्वरूप ठरते . सामाजिक बांधिलकी ,नैतिकता , कर्तव्याचे भान आणि जाण , घटना -कायद्याप्रती आदर , या सम लोकशाहीस पूरक गुणांचे सर्वपक्षीय अध:पतन झाल्यामुळे आता   केवळ व्यक्ती किंवा पक्ष बदलून परिस्थितीत बदल असंभव दिसतो . सक्षम पारदर्शक व्यवस्थेची निर्मिती हाच यावरील सर्वोत्तम एकमात्र पर्याय संभवतो .
   महोदय , लोकशाहीत लोकांचा सहभाग हा लोकशाहीचा गाभा म्हटला जातो परंतु वर्तमानात आम्हा नागरिकांना मतदानाव्यतिरिक्त कोणताच अधिकार नाही . पुन्हा -पुन्हा त्याच त्या कामावर खर्च केला जातो . अनावश्यक कामे केली जातात . अपारदर्शक कार्यपद्धत्तीमुळे कुठले कामे केली जातात हे सुद्धा जनतेस कळत नाही . ग्रामपंचायतीला शासनाने कोणत्या योजनेसाठी किती निधी दिला हे कोणालाच कळत नाही . तळे राखी तो पाणी चाखी अशी अवस्था झाल्यामुळे या निवडणुकांत 'लाखो -करोडोंची ' इन्व्हेस्टमेंट करायला उमेदवार तयार असतात कारण त्यांना परताव्याची खात्री () असते.
        लोकशाहीतील सर्वच घटकांना या संस्थातील गैरप्रकारांविषयी माहिती आहे तरीही सर्व हतबल आहेत . प्राप्त परिस्थितीचे सर्वांगीण विचार करता या संस्थांच्या सर्व व्यवहारात पारदर्शकता आणणे हाच एकमात्र उपाय संभवतो . आपण याचा त्वरीत विचार करावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थात पराकोटीची पारदर्शकता आणण्याचे निर्देश द्यावेत
        आम्हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या या संस्थांच्या सर्व बाबतीत जसे धोरणात्मक , आर्थिक पारदर्शकता हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे आणि तो आम्हास मिळायला() हवा . जर आगामी ६ महिन्यात आपण लुटीचे केंद्रे ठरणाऱ्या संस्थात पारदर्शकता आणली नाही तर मी कधीही या निवडणुकात मतदान करणार नाही . केवळ मतदानापुरती लोकशाही अभिर्प्रेत नाही आणि आमची त्यास मान्यता नाही .
          मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे म्हटले जाते परंतु त्याच बरोबर दान सत्पात्री असावे अशी आपली संस्कृती सांगते . विद्यमान परिस्थितीत  मात्र अपारदर्शक कारभारामुळे मतदान करणे म्हणजे  लुटीचे सूत्र कोणास द्यावयाचे यावरील शिक्का मोर्तब ठरते आहे !. महापौर -आयुक्त वा कोणालाही संपर्क केल्यास उत्तरच मिळत नाही नागरिकांच्या तक्रारीला प्रशासनाकडून  केराची टोपली दाखवली जाते .. मग मतदान तरी का करावे असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे .
     व्यवस्था परिवर्तन हे सरकारचे कर्तव्य आहे आणि सरकार जर ते टाळत असेन तर किमान 'मतदान ' न करून विद्यमान लुटीस विरोध दर्शविणे एवढेच आम्हा नागरिकांच्या हातात पर्याय उरतो आणि त्याच मार्गाचा मी स्वीकार करत आहे .
      दृष्टीक्षेपातील संभाव्य उपाय :
·         सर्व स्थानिक संस्थाना त्रयस्थ यंत्रणेकडून ऑडीट करणे अनिवार्य करावे . ऑडीट झालेला अहवाल नागरिकांसाठी खुला असावा .
·         प्रत्येक कामाचा लेखाजोखा संकेतस्थळावर उपलब्ध असावा .
·         COrporatOR आणि COntractOR या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्यामुळे काम करणारे तेच आणि दर्जावर नियंत्रण ठेवणारे तेच असे त्रांगडे झाल्यामुळे दर्जाहीन कामे हे नित्याचे झाले आहे . ज्या कंपनीला काम दिले आहे त्याची विस्तृत माहिती (कंपनीचा संचालक कोण , नोंदणी क्रमांक ) उपलब्ध असावी .
·         पुन्हा पुन्हा त्याच कामावर होणारा निधीचा अपव्यय थांबविण्यासाठी प्रत्येक कामाच्या दर्जाचा हमी कालावधी फिक्स करावा . कामाच्या पुनरावृत्तीची कालमर्यादा ठरवावी . प्रती वर्षी तेच पदपथ -गटार -रस्ते दुरुस्ती आता थांबायला हवी .
·         प्रत्येक प्रभागासाठी एक संकेत स्थळ असावे . त्यावर नगरसेवकाला मिळणाऱ्या निधीचा विनियोग कसा केला याची माहिती असावी . नागरिकांचा सूचना -तक्रार करण्याची सुविधा या संकेत स्थळावर असावी .
·         प्रत्येक कामाचा दर्जा आकस्मिकपणे तपासणारी राज्य स्तरीय त्रयस्थ  यंत्रणा असावी .
·         स्थानिक स्वराज्य संस्थातील कामाच्या दर्जाविषयी तक्रार करण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र सेल असावा .
·         स्थानिक पातळीवर स्थानिक नागरिकांचा समावेश असणारी " देखरेख " समिती असावी .
·         ग्रामपंचायत निधीच्या विनियोगाचे चावडी वाचन व्हायला हवे .

              अर्थातच उपाय अनंत आहेत , खरा प्रश्न आहे हे करण्याची मानसिकता राज्यकर्त्यांची आहे का ?
              सकारात्मक कृतीच्या प्रतीक्षेत ! चूकभूल द्यावी ,घ्यावी !!  धन्यवाद !!!
                                                                                                                                                        कळावे ,

 
                                                                                                                                               आपला मतदार ,
                                                                                                       नाव :

 
 


                                                                                     पत्ता : (अनिवार्य नाही)

 
 


                                                                                               दूरध्वनी क्रमांक :
संकल्पना सौजन्य : सुधीर लक्ष्मीकांत दाणी , ९८६९२२६२७२



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा