THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३

लोकशाहीचे मंदिरे असणाऱ्या सरकारी इमारतींच्या भ्रष्टाचार -टक्केवारीच्या पायावर व निकृष्ट दर्जाच्या कळसावर प्रहार निकडीचाच !

          


                 तब्बल ३१० कोटी  खर्च  करून सिडकोने बांधलेल्या  पालघर जिल्हा मुख्यालयाची  दोन वर्षात झालेली दुर्दशा  समोर आल्याने,बेलापूर नवी मुंबई न्यायालयाच्या इमारतीची देखील केवळ ५ वर्षातच दुरावस्था झालेलीअसल्याने  पुन्हा एकदा राज्यातील सरकारी इमारतींच्या दर्जाचा मुद्दा ऐरवणीवर आलेला आहे . आपल्या लोकशाही व्यवस्थेत काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात आणि त्यापैकी एक गृहीतक म्हणजे  "सरकारी इमारतींचा दर्जा हा निकृष्टच असणार ". त्यात वावगे वाटण्यासारखे काही नाही .

      अनेक 'प्रामाणिक सरकारे येऊन गेली , आहेत " तरी देखील    "अधिकत्तम मूल्य , न्यूनत्तम दर्जा "  या  सरकारी इमारतींच्या बांधकाम - देखभालीच्या सूत्राचे "प्रामाणिक " पणे पालन आजही राज्यातील चांद्यापासून ते बांद्यापर्यत   केले जाते आहे हेच पालघर जिल्हा इमारतीच्या दुरावस्थेने  व बेलापूर नवी मुंबई न्यायालयाच्या दुरावस्थेने  पुन्हा एकदा नव्याने शिक्कामोर्तब सिद्ध केलेले आहे असे म्हटले तर ते अतिशोयुक्तीचे ठरणार नाही .

                         सरकारी कार्यालयांच्या इमारती , म्हाडा , सिडको ,हडको , पंचायत समिती , जिल्हा परिषद , महापालिका यांच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या निवासी इमारती या निकृष्टच असायला हव्यात " असा जणू 'सरकारमान्य नियमच " आहे की  काय याची साक्ष देणारे असंख्य उदाहरणे देता येतील . 

               सिडको तर भ्रष्टाचाराच्या बाबतीत सर्वात अग्रेसर आहे हे डोळसपणे सिडकोच्या मुख्यालयात डोकावले तरी सहजपणे दिसून येते .  वर्तमानपत्रातून  येणाऱ्या बातम्यांतून त्यावर सातत्याने शिक्कामोर्तब होतंच असते . अगदी जी मंडळी संपूर्ण राज्याच्या कारभार हाकतात त्यांच्यासाठी बांधलेला  'मनोरा ' अगदी १८ वर्षातच कोसळत असेल तर " जे जे सरकारी , ते ते निकृष्ट "  हे सरकारी खर्चातून बांधल्या जाणाऱ्या इमारतींच्या बांधकामाचे सूत्र झालेले आहे हे सिद्ध करण्यासाठी  'मनोरा ' पेक्षा  आणखी वेगळा पुरावा असण्याची गरजच असत नाही .

                   प्रशासकीय व्यवस्थेला सरकारमधील लोकप्रतिनिधींचा धाक असला  लोकप्रतिनिधींना प्रशासनातील  भ्रष्टाचाराला वरदहस्त नसेल तर  ब्रिटिशांनाही लाजवेल " असे लुटीचे प्रकार घडणे शक्य होणार नाही . पण जमिनीवरील वास्तव हे आहे की  आपण केलेल्या भ्रष्टाचाराला नेतृत्वाचा सहभाग असणार आहे याची प्रशासनाला खात्री असल्याने ना प्रशासनाला धाक उरला आहे ना  सरकार मधील नेते मंडळींना . " आपण सर्व भाऊ -भाऊ मिळून सारे खाऊ " अशा प्रकारची अर्थपूर्ण साखळी कंत्राटदार -प्रशासन -लोकप्रतिनिधी मध्ये दशकोनी  दशके अबाधित आहे .

                     आपण कितीही निकृष्ट इमारती बांधल्या तरी आपणाला 'कोणीही काही करू'  शकत नाही  याची  १०० टक्के खात्री प्रशासनाला  कंत्राटदाराला असल्याने करोडो रुपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या अगदी  न्यायालयाच्या इमारती देखील  'भ्रष्टाचार ,टक्केवारी , खाबुगिरी ' पासून मुक्त राहिलेल्या नाहीत यासाठी नवी मुंबईतील 'न्यायालयाच्या इमारतीचे ' उदाहरण बोलके आहे .  या इमारतीची देखील दुरावस्था / वर्षातच झालेली आहे . मा . न्यायाधीश ज्या इमारतीत राहतात त्या इमारतीची दुरावस्था भयानक झालेली दिसते .  डॉक्टर देखील रोगाचे निदान करू शकत नसेल तर सरकारी इमारतींचे भविष्य कसे बदलणार हा खरा अनुत्तरित प्रश्न आहे .

                  जोवर  न्यायालयीन यंत्रणा सरकारी इमारतींच्या बाबतीत  सुओमोटो ' पद्धतीने जनहित याचिका दाखल करून घेत नाही आणि जोवर सरकारी इमारतींच्या  बांधकामास जबाबदार असणाऱ्या  अधिकारी -कंत्रादार यांचे उत्तरदायीत्व फिक्स करत नाही ,  सरकारी इमारतीची २०-३० वर्षासाठीची वॉरन्टी -गॅरन्टी निश्चित करत नाही   वर्तमानात करोडो रुपयांचा खर्च केल्या जाणाऱ्या इमारतींचा दोष निवारण कालावधी हा  / वर्षांपुरता सीमित असतो ) , सर्व आस्थापनांना इमारतीच्या निर्मिती -देखभालीचा खर्च हा जनतेसाठी पब्लिक डोमेनवर खुला करण्याची सक्ती करत नाही  तोवर  सरकार मान्य लूट ' सुरूच  राहणार हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज असत नाही .

                    सरकारी इमारतींच्या बाबतीतील लुटीच्या बाबतीत आणखी एक गंभीर मुद्दा दिसून येतो आणि तो म्हणजे इमारतींचा देखभाल खर्च .  सरकारी इमारतींच्या देखभालीचे कंत्राट देखील करोडो मध्ये असते  आणि तरी देखील कुठल्याही सरकारी इमारतीत डोळसपणे डोकावले तर तेथील दुरावस्था सहजपणे लक्षात येते .  जे सामान्य नागरिकांना दिसते , ते प्रशासन -नेते मंडळींना दिसत नसेल यावर कोण विश्वास ठेवेल . उलट जनतेला हा विश्वास आहे की  या लुटीत सर्वच सहभागी आहेत .

              ब्रिटिशांनी भारताला लुटले  असे सातत्याने म्हटले जाते . हे खरे असले तरी ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारतींचा  अन्य सर्व कामांचा दर्जा उच्च होता हे अधोरेखित करणाऱ्या अनेक इमारती , ब्रिज आज कणखरपणे उभा आहेत . त्यामुळे ब्रिटिशांनीच देशाला लुटले हे अर्धसत्य ठरते , स्वातंत्र्य पश्चात प्रशासन  लोकप्रतिनिधी देशाला लुटत आहेत हे 'पूर्ण सत्य '   कटू वास्तव आहे .

 





सुधीर लक्ष्मीकांत दाणी   (लेखक अलर्ट सिटिझन्स फोरमचे प्रवर्तक असून विविध सामाजिक विषयाचे अभ्यासक आहेत )  danisudhir@gmail.com   9869226272



1 टिप्पणी:

  1. सुंदर लेख
    राजकारण्यांना याची लाज वाटत नाही . सामान्याचे घर 50 लाखा तयार होते तर सरकारी त्याच आकारमानाचे घर 50 कोटी ला. हे न उमगलेले कोडे .आहे सामान्याचे घर शंभर वर्षे टिकते तर सरकारी पाच वर्षात धुळीला मिळते.

    उत्तर द्याहटवा