THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

समाजसेवक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समाजसेवक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

"वांझोट्या " समाजसेवकांची शहरांचे बकालीकरण वाढवणारी अनधिकृत बॅनरबाजी निषेधार्यच !


              गेल्या दशकामध्ये जनतेला समाजसेवकांची ओळख हि त्यांच्या जनतेप्रतीच्या कामातून होत असे . अडलेल्या -नडलेल्या नागरिकांना समाजसेवक हे मोठा आधार वाटत असे कारण समस्या -प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हि मंडळी सदैव तत्पर असत . धावून येत असत .  अशा मंडळींची समाजाप्रती असणारी कामे , सेवा लक्षात घेत समाजच स्वतः हुन त्यांना "समाजसेवक " अशी उपाधी लावत असत . 'समाजमान्य समाजसेवक ' अशी हि मंडळी असत .

                 काळ बदलत गेला आणि समाजसेवकांची परिभाषा बदलत  गेली .  अलीकडच्या काळात समाजसेवकांची ओळख जनतेला होती ती गणेशोत्सव ,नवरात्रोत्सव , दहीहंडी , दसरा - दिवाळी अशा उत्सवाच्या वेळी राज्याच्या कानाकोपऱ्यात लावल्या जाणाऱ्या बॅनर्समधून . या मंडळींनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या नावाने  (ते देखील  स्वतःच्या खर्चाने ) " समाजसेवक " अशा नावाने लावलेल्या बॅनर्समधून  ते समाजसेवक आहेत हे नागरिकांना माहित पडते . बॅनर्स व्यतिरिक्त समाजकार्यात हे कुठेच दिसत नाहीत .    समाज मान्यता नसलेल्या अशा  "स्वयंघोषित समाजसेवकांची " भाऊगर्दी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे . 

 

           आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे या समाजसेवकांचा भूतकाळ कसाही असला तरी त्यांचे  भविष्य किती उज्वल , महान असणार हे देखील जनतेला वेळोवेळी लागणाऱ्या बॅनर्समधूनच कळते .  यांचे भविष्य असते  'भावी सरपंच , भावी पंचायत समिती -जिल्हा परिषद सदस्य -अध्यक्ष , भावी आमदार -खासदार " . जनतेने ठरवण्याआधीच यांचे पद फिक्स झालेले असते हे विशेष .

               त्यांच्या कर्तृत्वाचा , समाजसेवेचा आलेख गुप्तच राहताना दिसतो . महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना प्रश्न हा  आहे की  , सणउत्सव , निवडणुकांचा काळ वगळता हि समाजसेवक मंडळी नेमकी कुठे असतात  ? समाजसेवकांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर संख्या असून देखील महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न -समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित का राहतात ? समाजसेवकांच्या समाजसेवेचे प्रतिबिंब प्रत्यक्ष समाजात उमटताना  का दिसत नाही .

                    अत्यंत खेदाची गोष्ट हि आहे की  जेंव्हा जेंव्हा उत्सवांच्या निमित्ताने बॅनर्स लावले जातात तेंव्हा तेंव्हा असे दिसते की  ज्या देवतेचा उत्सव आहे त्या देवतेचा फोटो कुठे तरी कोपऱ्यात लहान असतो . कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीत दिसून पण येत नाही पण तथाकथित समाजसेवकांचे फोटो मात्र देवतांच्या फोटो पेक्षा मोठे असतात .  देवापेक्षा हि महान असल्याची प्रचिती यांना झालेली असती की काय ? अशी भावना जनमानसात  निर्माण झालेली दिसते .

               आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ९० टक्क्याहून अशा समाजसेवकांचे , नेत्यांना विविध प्रसंगी देण्यात येणाऱ्या शुभेच्छांचे बॅनर्स देखील हि मंडळी स्वतःच्या पैशानेच स्वतःच लावतात . बॅनर्सवर झळकणाऱ्या  कार्यकर्त्यांना देखील आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे , नेत्याला अमुक -तमुक पद प्राप्त झाले आहे हे बॅनर्समधूनच कळते .

            खरे 'समाजमान्य समाजसेवक ' कसे असतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा . टाटांइतके स्वतःच्या पैशाने समाजकार्य अन्य कोणीच करत नसेल . तरी देखील रतन टाटांचे  रस्त्यावर ,सोशल मीडियावर समाजसेवक म्हणून कधी बॅनर्स झळकलेले दिसतात का ? कधीच नाही . अगदी रतन टाटांना महाराष्ट्र राज्याचा 'उद्योगरत्न ' हा पुरस्कार मिळाल्यावर देखील ना कुठे बॅनर्स झळकलेले दिसले , ना वर्तमानपत्रात पण भरून कौतुक करणाऱ्या जाहिराती प्रकाशित झालेल्या दिसल्या  . याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना अशा खोट्या प्रसिद्धीची गरजच पडत नाही कारण त्यांनी आपल्या कर्तृत्वातून , समाजसेवेतून प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवलेले असते  .

   ज्या गोष्टीतून फलनिष्पत्ती संभवत नाही त्यास वांझोटे असे संबोधले जाते .  अलीकडच्या काळातील समाजसेवकांच्या बाबतीत देखील असेच होताना दिसते आहे  .  महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अशा तथाकथित समाजसेवकांची भाऊगर्दी असली तरी  त्यांचा कुठलाच लाभ प्रत्यक्ष समाजाला होताना दिसत नाही  . फल   निष्पत्ती शून्य अशा समाजसेवकांची बॅनरबाजी समाजमनाच्या दृष्टीने पूर्णतः निषेधार्यच ठरते .  

                        शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे की  , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावायचे असतील तर त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असते , जितक्या दिवसांसाठी बॅनर्स लावायचे आहे त्या दिवसांसाठीचे शुल्क भरणे अनिवार्य असते . पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नियमाला पायदळी तुडवत सर्रासपणे मोफत व अनधिकृतपणे संपूर्ण राज्यभर बॅनरबाजी केली जाते . मा . न्यायालयाने आदेश देऊन देखील स्थानिक स्वराज्य संस्थातील संलग्न अधिकारी अनधिकृत बॅनर्सवर कारवाई करण्याचे धाडस दाखवताना दिसत नाही .  स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बोटावर नाचणारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन कठपुतळ्या सारखे झालेले असल्याने प्रशासनाचा धाक उरलेला नाही .

गणपती बाप्पा ला  बुद्धीची   देवता असे मानले जाते . गणपती बाप्पाला एकच प्रार्थना आहे की  कुठलेही सामाजिक काम न करणाऱ्या लाखो तथाकथित  समाजसेवकांना सुबुद्धी दे . त्यांना हि समज दे की  समाजसेवेची काम नसेल करणार तरी हरकत नाही पण किमान खेडी -शहरे बॅनर्स लावून बकाल तरी करू नका . अशा वांझोट्या समाजसेवकांची जनतेला बिलकुल आवश्यकता नाही आणि सहानभूती हि नाही . असेल तर तुमच्या विषयी चीडच आहे .

 


 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी ,

Contact : danisudhir@gmail.com   9869226272

लेखक विविध सामाजिक विषयांचे  अभ्यासक भाष्यकार आहेत 

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे " कै. लक्ष्मीकांत दाणी महानगरपालिका मुख्यालय " असे नामकरण करा

 

प्रति ,                                                                                                                             

मा . आयुक्त ,

नवी मुंबई महानगरपालिका ,

नवी मुंबई.

 

विषय : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे  " कै. लक्ष्मीकांत दाणी महानगरपालिका मुख्यालय " असे नामकरण  करावे असा प्रस्ताव देणारे   विनंती पत्र  .

      महोदय ,

 

                    नवी मुंबई महानगरपालिकैचा    गेली २५ वर्षांपासूनचा रहिवाशी आणि करदाता आहे . नवी मुंबई पालिका क्षेत्रात असणारे रस्ते (अगदी  एकूण २०० मीटर अंतर असणारे गल्लीतले देखील ) , बगीचे ,तलाव , पालिकेच्या इमारती जसे प्राथमिक आरोग्य केंद्रे , रुग्णालये ,विविध प्रकारच्या समाजोपयोगी इमारती तत्सम अन्य ठिकाणांना नावे दिलेली आहेत . सर्वसामान्यपणे  राजकीय -सामाजिक -सांस्कृतिक -खेळ -क्रीडा -साहित्य अशा विविध क्षेत्रात विशेष कर्तृत्व असणाऱ्या , समाजाप्रती सेवा करणाऱ्या , समाजासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या समाजसेवकांची नावे देण्याचा प्रघात आहे . सदरील व्यक्तीच्या सामाजिक उत्तरदायित्वाला ,कर्तृत्वाला सलाम , ऋण व्यक्त करण्यासाठी नावे दिले जातात .

                 ज्या अर्थी  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काही हजारात नामकरण झालेले आहेत त्या अर्थी नवी मुंबईला महान ,कर्तृत्ववान , समाजसेवकांची उज्वल परंपरा आहे .  या शहराचा नागरिक या नात्याने याचा सार्थ अभिमानच आहे . ज्या मातीत आपण राहतो त्या मातीला अशा कर्तृत्वान समाजसेवकांची उज्वल परंपरा आहे  हे पाहून मन धन्य होते आहे .  नवी मुंबई पालिकेने ज्या ज्या व्यक्तींची नावे देऊन त्या त्या थोर पुरुषांनी आयुष्यभर केलेल्या जनसेवेचा, त्यांच्या विशेष कर्तृत्वाचा  आदर केला आहे  त्या सर्व थोर महात्म्यांना मनापासून नमस्कार  .

                माझे वडील कै .  श्री . लक्ष्मीकांत प्रल्हादराव दाणी हे देखील  ७० च्या दशकातील आदर्श शिक्षक ,  समाजसेवक होते . त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे कुटुंबासाठी कमी तर  विद्यार्थ्यांसाठी ,समाजासाठी वेचलेले आहे . प्रत्येक संकटाच्या वेळी धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते खऱ्या अर्थाने "समाजसेवक " होते  अशी धारणा सर्व गावकऱ्यांची आहे .

            त्यांचा आणखी विशेष गुण म्हणजे त्यांना आयुष्यभर अगदी सुपारीच्या खांडाचे देखील व्यसन नव्हते . त्यामुळे मद्यप्राशन वगैरे तर दूरची गोष्ट झाली . त्यांना कधीच कुठल्या गुन्ह्यासाठी  आरोपी म्हणून पोलीस स्टेशनची , न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली नव्हती . अशा गुणांचा  ( सद्गुणांचा म्हणणे जास्त उचित ठरेल ) देखील नामकरणासाठी पात्र ठरण्यासाठी विचार केला जात असेल अशी माझी धारणा असल्याने मी या 'अधिकच्या  गुणांचा ' विशेष उल्लेख करत आहे .

                सदरील प्रस्तावासाठी " पात्र उमेदवार " म्ह्णून माझे वडील पात्र ठरतात अशी माझी  स्पष्ट धारणा  आहे कारण त्यांचे संपूर्ण आयुष्य हे "प्रामाणिक आणि भ्रष्टाचार विरहित " होते . याचे प्रमुख कारण म्हणजे स्वतः ते कधी सरपंच नव्हते ना नगरसेवक वा कुठल्याच राजकीय पदावर ते नव्हते . त्याच बरोबर ना त्यांचे  वडील  वा अन्य कोणी जवळचे नातेवाईक राजकारणी होते त्यामुळे कधीच रुपयाचा देखील भ्रष्टाचार -गैरव्यवहार त्यांनी केलेला नाही . स्वच्छ चारित्र्य हा देखील  नाव देण्यासाठीचा एक प्रमुख निकष असेल अशी माझी खात्री आहे म्हणून मी सदरील माहिती जाणीवपूर्वक प्रशासनासमोर ठेवत आहे जेणेकरून या प्रस्तावाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जाईल , तो मंजूर केला जाईल .

              नवी मुंबई पालिकेत विविध ठिकाणी नावे देण्यासाठी  ज्या प्रकारची  तत्परता आजवर दिसून आलेली आहे त्याच धर्तीवर सदरील विनंतीचा तत्परतेने विचार करून पालिका मुख्यालयास  माझ्या वडिलांचे नाव दिले जाईल अशी मला अपेक्षा आहे . सदरील प्रस्तावाची विनंती मान्य करून त्यावर तातडीने कार्यवाही झाल्यास मी  पालिका प्रशासनाचे स्वागत अभिनंदनच करेल .

               पण सदरील प्रस्ताव नामंजूर वा नादखल केला गेल्यास त्या मागची कारणमीमांसा जाणून घेणे हा माझा घटनादत्त अधिकार आहे . भारतीय  लोकशाहीचा मूळ पाया हाच मुळात जनता जनार्धन (WE THE PEOPLE.. ) असल्याने प्रत्येक प्रशासकीय कृतीची माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे . आजवर जी नावे दिली गेलेली आहेत ती नावे पात्र ठरवण्यासाठीचे निकष  त्यातील कोणत्या निकषात माझ्या वडिलांचा प्रस्ताव बसत नाही याचा खुलासा केला  जाईल अशी माझी अपेक्षा आहे .

            पात्र  व्यक्तीचा म्हणजेच माझ्या वडिलांच्या नावाचा प्रस्ताव नाकारला जाणे हा मी माझा अपमान समजतो . या पार्श्वभूमीवर मी प्रशासनास प्रश्न विचारू इच्छितो की , राजकीय -प्रशासकीय हितसंबंध , वरदहस्त हाच पात्रतेचा निकष असेल तर अशा व्यक्तींची नावे  सार्वजनिक ठिकाणाला देणे हा समस्त करदात्या नागरिकांचा अपमान नव्हे काय ? त्याही पुढे जाऊन प्रश्न आहे की , मुळात वैयक्तिक स्वरूपाची नावेच का द्यायची ? उलटपक्षी त्या त्या विभागाची नावे देणे जास्त संयुक्तिक ,उचित ठरत नाही का ? उदा .  बेलापूरला असणाऱ्या  प्राथमिक आरोग्य केंद्राला बेलापूर आरोग्य केंद्र , रस्त्यांना रोड क्रमांक , ,.... अशा प्रकारचे  नामकरण जास्त सोयीचे ठरते .

                   हे पुन्हा एकदा नम्रपणे नमूद करतो की ,सदरील प्रस्तावास नकार हा माझा अपमान आहे कारण  मी सुद्धा नवी मुंबई पालिकेचा करदाता आहे , नागरिक आहे आणि जो सन्मान अन्य नागरिकांचा केला जातो तसाच सन्मान माझा देखील केला जायला हवा अशी माझी अपेक्षा आहे  .

                  प्रशासन सुयोग्य कारणास्तव सदरील विनंती प्रस्ताव नाकारणार असेल तर प्रशासनास माझी विनंती आहे की , भविष्यात सार्वजनिक ठिकाणाला राजकीय -प्रशासकीय हितसंबंधातून  नावे देण्याच्या कार्यपद्धतीला पूर्णपणे पूर्णविराम द्यावा .

             नगरसेवक -आमदार -खासदारांना मिळणारा निधी हा जनतेच्या कराचा पैसा असतो त्यामुळे त्यांची वैयक्तिक नावे अगदी बेंच पासून देणे हे लोकशाही मूल्याची प्रतारणा ठरते . लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वैयक्तिक उत्पनातून कामे केल्यास त्यांच्या सौजन्याने अशा प्रकारच्या पाट्या लावणे रास्त आहे पण सार्वजनिक पैशातून  दिल्या जाणाऱ्या सुविधांना  वैयक्तिक नावे देणे कितपत रास्त ठरते ?

नामकरणाबाबत पारदर्शक धोरण ठरवा :

                  माझ्या वडिलांच्या नावाचा प्रस्ताव हा अत्यंत रास्त आहे अशी माझी १०० टक्के धारणा आहे आणि म्हणून आपण त्याचा विचार करावा हि माझी पुन्हा -पुन्हा प्रशासनास विनंती राहील .

                 सदरील प्रस्ताव नाकारला जाणार असेल तर नामकरणाबाबत पालिकेचे धोरण कोणते याचा सविस्तर ,सखोल अहवाल  मला दिला जावा अशी माझी प्रशासनास नम्र विनंती आहे .  अर्थातच केवळ "साम -दाम -दंड , प्रशासकीय -राजकीय हितसंबंध " हेच पालिकेचे सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या नावाबाबत असेल तर ते गैर आहे आणि  म्हणून पालिकेने एक तर तातडीने या विषयाच्या अनुषंगाने उच्च स्तरीय समिती नेमून "सार्वजनिक ठिकाणच्या नामकरणाबाबतचे धोरण निश्चित करावे आणि ते पब्लिक डोमेनवर खुले करावे " . त्याच बरोबर या निकषात बसणाऱ्या ज्या ज्या व्यक्तींची नावे आजवर दिली गेलेली आहेत  ती तातडीने मागे घ्यावीत आणि भविष्यात अपात्र व्यक्तींची नावे सार्वजनिक ठिकाणाला दिली जाणार नाहीत याबाबतची काळजी घ्यावी . 

                  नामकरण हा केवळ प्रशासकीय मुद्दा नसून तो आर्थिक हानीचा देखील मुद्दा आहे , करदात्या जनतेच्या पैशाच्या अपव्ययाचा देखील मुद्दा आहे कारण प्रत्येक ठिकाणी नावाच्या पाट्या लिहण्यासाठी  करोडो रुपयांचा चुराडा केला जाताना दिसतो आहे . कधी विटांच्या भिंती बांधून तर / वर्षांनी स्टीलच्या फ्रेम मध्ये नावे लिहून जनतेच्या पैशांची शब्दशः लूट होते आहे .  पालिकेच्या अपारदर्शक कारभारामुळे हा सर्व गैरव्यवहार झाकली मूठ सव्वा लाखाची अशा स्वरूपाचा आहे   .

महोदय,

               आपणास पुन्हा पुन्हा नम्र निवेदन आहे की  , माझ्या वडिलांचे नाव मुख्यालयास देऊन आपण त्यांचा सन्मान करावा . त्यांना वाहिलेली ती खरी श्रद्धांजली ठरेल . आपणांकडून  सकारात्मक प्रतिसाद मिळेल या अपेक्षेने तूर्त पूर्णविराम .

 

कळावे आपला

सुधीर लक्ष्मीकांत दाणी

९८६९२२६२७२  / danisudhir@gmail.com

महत्वाची तळटीप : बोटावर मोजता येईल अशा सन्माननीय व्यक्तींच्या , ज्यांनी खरंच समाजासाठी आपले आयुष्य वाहिलेले आहे अशा थोर व्यक्तींच्या नावाबाबत आक्षेप नसून  सरसकटपणे गल्ली -बोळात केल्या जाणाऱ्या अपात्र व्यक्तीबाबतच्या नामकरणाबाबत आक्षेप आहे .

 

प्रत : माहिती सुयोग्य कार्यवाहीसाठी :

 

) मा . मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य .

) मा . उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य .

) मा . नगरविकासमंत्री , महाराष्ट्र राज्य .

)मा . मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्य .

) मा . नगरविकास सचिव , महाराष्ट्र राज्य .

) मा . इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया ( प्रसिद्धीसाठी )