THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

लाडक्या मतदारांची मागणी

 लाडक्या मतदारांची मागणी  : फडणवीस साहेब ! भ्रष्टाचार मुक्त   पारदर्शक कारभाराच्या वचनपूर्तीसाठी  आता तरी   नोकरशाहीच्या नियुक्ती - बदलीतील गैरप्रकार   थांबवण्याचे धाडस दाखवा !!                    

       सरकार बदलले की  प्रशासकीय व्यवस्थेत मोठे फेरबदल केले जातात . वस्तुतः प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक संवर्गासाठीचा नियुक्तीचा कमाल कालावधी राज्य सरकारच्या बदली नियुक्ती अधिनियमानुसार ठरवलेला असतो त्यानुसार नोकरशाहीच्या बदल्या -नियुक्त्या होणे अपेक्षित असते . परंतू सरकार बदलले की  दस्तुरखुद्द सरकारच आपल्या स्वतःच्या नियम -कायदयाची पायमल्ली करत असते आपल्या सोयीनुसार "लाडक्या अधिकाऱ्याची वर्णी " लावत असते .

                      भ्रष्टाचार मुक्त कारभाराच्या दवंड्या सातत्याने पिटल्या जातात . भाजपा ने तर "पारदर्शक कारभार , भ्रष्ठाचार मुक्त कारभार " याचे पेटंटच घेतलेले आहे अशा प्रकारे त्यांचे कार्यकर्ते , मंत्री , नेते , पक्षप्रमुख सातत्याने याचा पुनरुच्चार करताना दिसतात


     भ्रष्टाचार मुक्त कारभाराचे स्वप्न पूर्ण करावयाचे असेल तर भ्रष्ट व्यवस्थेच्या मुळाशी असणाऱ्या कारणावर घाव घालण्याचे धाडस दाखवणे अत्यंत आवश्यक आहे . नोकरशाहीच्या त्यात ही खास करून महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी , जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त , पोलीस विभागातील वरिष्ठ पदे , पोलीस आयुक्त यांच्या नियुक्ती बदल्यातील "आर्थिक देवाणघेवाण " हीच भ्रष्ट व्यवस्थेची जननी आहे .

                       मलईदार पोस्टिंगच्या ठिकाणी नियुक्ती -बदली मिळवण्यासाठी अगदी करोडो रुपये मोजावे लागतात . त्यामुळे एकदा का बदली मिळाली की  तो अधिकारी आपण केलेल्या  " गुंतवणुकीच्या शेकडो पट वसुलीचा श्रीगणेशा " करतो . अर्थातच हे अत्यंत नागडे वास्तव आहे आणि ग्रामसेवकापासून ते मुख्य सचिवांपर्यंत आणि सरपंचापासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यत याची परिपूर्ण माहिती असती . त्यामुळे या प्रकारात शासन प्रशासनाची युती  आघाडी असल्याने त्याच्यावर घाला घालण्याचे धाडस दाखवले जात नाही . हा आजवरच्या सर्वपक्षीय सरकारचा इतिहास आहे .

                         "महाराष्ट्र आता थांबणार नाही " हे घोषवाक्याचा नारा देत फडणवीस सरकारने कारभार सुरु केलेला आहे . या सरकारने देखील आजवरच्या पायंडयानुसार प्रशासकीय  'घाऊक बदल्या ' सुरु केलेल्या आहेत . मा . नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून दिलेल्या 'भ्रष्टाचार मुक्त कारभार , पारदर्शक कारभार , लोकाभिमुख कारभार " या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने 'पहिले पाऊल ' टाकण्यासाठी सर्वात आवश्यक बाब आहे ती म्हणजे " नोकरशाहीच्या नियुक्ती -बदलीतील  आर्थिक  देवाणघेवाणीला चाप लावण्याची आणि पुरोगामी महाराष्ट्रातील बदल्या नियुक्तीतील गैर प्रकार थांववण्याची .  

                     "महाराष्ट्र आता थांबणार नाही " हे सांगणाऱ्या फडणवीसांनी  नोकरशाहीच्या नियुक्ती -बदल्यातील  आर्थिक नैतिक भ्रष्टाचार थांबवण्याचे धाडस दाखवयाला हवी अशी जनभावना आहे . सर्वच अधिकारी हे शासनाने नियुक्त केलेले असतात त्यामुळे सर्वच अधिकारी हे  विहित अर्हतेचे , आवश्यक बुद्धिमत्ता असणारे   त्यात ठराविक अधिकारी  "अधिक लाडके अधिकारी " असण्याचे कारणच काय ?

                             मुख्यमंत्री महोदय , खूप झाले आता भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभाराबाबतचे शब्दच्छल . आता गरज आहे ती प्रत्यक्ष कृतीची आणि ती कृती अंमलात आणण्यासाठी धाडस दाखवण्याचे  .

                        भविष्यात महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर थांबू नये , कल्याणकारी योजनांच्या उद्दिष्टपूर्ती बाबत थांबू नये , निधीच्या सुयोग्य विनियोगाबाबत थांबू नये  , सरकारी शिक्षण व्यवस्था , सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांच्या दर्जाच्या उच्चीकरणाबाबत थांबू नये , महाराष्ट्रातील  कर रूपाने प्राप्त होणाऱ्या निधीचा  सुयोग्य विनियोग थांबू नये यासाठी  तरी महाराष्ट्र   "बदल्या -नियुक्तीतील गैरप्रकार " थांबवा . महाराष्ट्र या बाबतीत तरी थांबवा . राज्यातील ग्रामसेवक ते मंत्रालयातील सचिव पातळी पर्यतच्या सर्व संवर्गाच्या बदल्या आणि नियुक्त्या या केवळ आणि केवळ संगणकीय पद्धतीने , लॉटरी पद्धतीनेच होतील असा निर्णय घेण्याचे धाडस दाखवा  हि "लाडक्या मतदारांची " आग्रही मागणी आहे .

       जो पर्यंत शासकीय कर्मचारी -अधिकाऱ्यांच्या नियुक्ती बदलीतील गैरप्रकार थांबवले जात नाहीत तोवर "पारदर्शक कारभारच्या घोषणा " या केवळ आणि केवळ मगरीचे आश्रुच ठरतात हे कटू सत्य असणार  आहे मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असू देत , कोणीही मुख्यमंत्री असू देत.

 

                                                       सुधीर लक्ष्मीकांत दाणीप्रवर्तक सजग नागरिक मंच नवी मुंबई

                                                                       ९८६९२२६२७२alertcitizensforumnm@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा