THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

भ्रष्टाचार मुक्त कारभार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भ्रष्टाचार मुक्त कारभार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

लाडक्या मतदारांची मागणी

 लाडक्या मतदारांची मागणी  : फडणवीस साहेब ! भ्रष्टाचार मुक्त   पारदर्शक कारभाराच्या वचनपूर्तीसाठी  आता तरी   नोकरशाहीच्या नियुक्ती - बदलीतील गैरप्रकार   थांबवण्याचे धाडस दाखवा !!                    

       सरकार बदलले की  प्रशासकीय व्यवस्थेत मोठे फेरबदल केले जातात . वस्तुतः प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक संवर्गासाठीचा नियुक्तीचा कमाल कालावधी राज्य सरकारच्या बदली नियुक्ती अधिनियमानुसार ठरवलेला असतो त्यानुसार नोकरशाहीच्या बदल्या -नियुक्त्या होणे अपेक्षित असते . परंतू सरकार बदलले की  दस्तुरखुद्द सरकारच आपल्या स्वतःच्या नियम -कायदयाची पायमल्ली करत असते आपल्या सोयीनुसार "लाडक्या अधिकाऱ्याची वर्णी " लावत असते .

                      भ्रष्टाचार मुक्त कारभाराच्या दवंड्या सातत्याने पिटल्या जातात . भाजपा ने तर "पारदर्शक कारभार , भ्रष्ठाचार मुक्त कारभार " याचे पेटंटच घेतलेले आहे अशा प्रकारे त्यांचे कार्यकर्ते , मंत्री , नेते , पक्षप्रमुख सातत्याने याचा पुनरुच्चार करताना दिसतात


     भ्रष्टाचार मुक्त कारभाराचे स्वप्न पूर्ण करावयाचे असेल तर भ्रष्ट व्यवस्थेच्या मुळाशी असणाऱ्या कारणावर घाव घालण्याचे धाडस दाखवणे अत्यंत आवश्यक आहे . नोकरशाहीच्या त्यात ही खास करून महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी , जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त , पोलीस विभागातील वरिष्ठ पदे , पोलीस आयुक्त यांच्या नियुक्ती बदल्यातील "आर्थिक देवाणघेवाण " हीच भ्रष्ट व्यवस्थेची जननी आहे .

                       मलईदार पोस्टिंगच्या ठिकाणी नियुक्ती -बदली मिळवण्यासाठी अगदी करोडो रुपये मोजावे लागतात . त्यामुळे एकदा का बदली मिळाली की  तो अधिकारी आपण केलेल्या  " गुंतवणुकीच्या शेकडो पट वसुलीचा श्रीगणेशा " करतो . अर्थातच हे अत्यंत नागडे वास्तव आहे आणि ग्रामसेवकापासून ते मुख्य सचिवांपर्यंत आणि सरपंचापासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यत याची परिपूर्ण माहिती असती . त्यामुळे या प्रकारात शासन प्रशासनाची युती  आघाडी असल्याने त्याच्यावर घाला घालण्याचे धाडस दाखवले जात नाही . हा आजवरच्या सर्वपक्षीय सरकारचा इतिहास आहे .

                         "महाराष्ट्र आता थांबणार नाही " हे घोषवाक्याचा नारा देत फडणवीस सरकारने कारभार सुरु केलेला आहे . या सरकारने देखील आजवरच्या पायंडयानुसार प्रशासकीय  'घाऊक बदल्या ' सुरु केलेल्या आहेत . मा . नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून दिलेल्या 'भ्रष्टाचार मुक्त कारभार , पारदर्शक कारभार , लोकाभिमुख कारभार " या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने 'पहिले पाऊल ' टाकण्यासाठी सर्वात आवश्यक बाब आहे ती म्हणजे " नोकरशाहीच्या नियुक्ती -बदलीतील  आर्थिक  देवाणघेवाणीला चाप लावण्याची आणि पुरोगामी महाराष्ट्रातील बदल्या नियुक्तीतील गैर प्रकार थांववण्याची .  

                     "महाराष्ट्र आता थांबणार नाही " हे सांगणाऱ्या फडणवीसांनी  नोकरशाहीच्या नियुक्ती -बदल्यातील  आर्थिक नैतिक भ्रष्टाचार थांबवण्याचे धाडस दाखवयाला हवी अशी जनभावना आहे . सर्वच अधिकारी हे शासनाने नियुक्त केलेले असतात त्यामुळे सर्वच अधिकारी हे  विहित अर्हतेचे , आवश्यक बुद्धिमत्ता असणारे   त्यात ठराविक अधिकारी  "अधिक लाडके अधिकारी " असण्याचे कारणच काय ?

                             मुख्यमंत्री महोदय , खूप झाले आता भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभाराबाबतचे शब्दच्छल . आता गरज आहे ती प्रत्यक्ष कृतीची आणि ती कृती अंमलात आणण्यासाठी धाडस दाखवण्याचे  .

                        भविष्यात महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर थांबू नये , कल्याणकारी योजनांच्या उद्दिष्टपूर्ती बाबत थांबू नये , निधीच्या सुयोग्य विनियोगाबाबत थांबू नये  , सरकारी शिक्षण व्यवस्था , सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांच्या दर्जाच्या उच्चीकरणाबाबत थांबू नये , महाराष्ट्रातील  कर रूपाने प्राप्त होणाऱ्या निधीचा  सुयोग्य विनियोग थांबू नये यासाठी  तरी महाराष्ट्र   "बदल्या -नियुक्तीतील गैरप्रकार " थांबवा . महाराष्ट्र या बाबतीत तरी थांबवा . राज्यातील ग्रामसेवक ते मंत्रालयातील सचिव पातळी पर्यतच्या सर्व संवर्गाच्या बदल्या आणि नियुक्त्या या केवळ आणि केवळ संगणकीय पद्धतीने , लॉटरी पद्धतीनेच होतील असा निर्णय घेण्याचे धाडस दाखवा  हि "लाडक्या मतदारांची " आग्रही मागणी आहे .

       जो पर्यंत शासकीय कर्मचारी -अधिकाऱ्यांच्या नियुक्ती बदलीतील गैरप्रकार थांबवले जात नाहीत तोवर "पारदर्शक कारभारच्या घोषणा " या केवळ आणि केवळ मगरीचे आश्रुच ठरतात हे कटू सत्य असणार  आहे मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असू देत , कोणीही मुख्यमंत्री असू देत.

 

                                                       सुधीर लक्ष्मीकांत दाणीप्रवर्तक सजग नागरिक मंच नवी मुंबई

                                                                       ९८६९२२६२७२alertcitizensforumnm@gmail.com