THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

“ उचलून “ अधिवेशनाचे प्रयोजन काय ?

 

            संघर्षांच्या टीपेवर नागपूर हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे .  अधिवेशनाचा मुख्य हेतू असतो जनतेच्या समस्यांवर -प्रश्नांवर सर्वागीण चर्चा आणि त्या चर्चेच्या माध्यमातून प्रश्न -समस्यांची सोडवणूक .  हि झाली अपेक्षा . वास्तव मात्र अगदी त्याच्या विसंगत . 

      संपूर्ण अधिवेशनाच्या काळात कोणता जनकल्याणाचा मुद्दा समोर आला ? जनप्रतिनिधींचे चर्चेचे विषय आणि प्रत्यक्ष जनतेचे प्रश्न यांच्यात काही नाते दिसले का ?  शेतकऱ्यांच्या आत्महत्या , उद्योगांनी राज्याकडे फिरवलेली पाठ , करोना संदर्भातील नवीन आव्हान , वाढती बेरोजगारी , सोयाबीन -कापूस या सारख्या पिकांचे पडणारे भाव , ओला दुष्काळाने नुकसानीची भरपाई , वाढती महागाई  अशा प्रकारे हनुमानाच्या शेपटी प्रमाणे वाढणारी जनतेच्या प्रश्नांची यादी आहे . प्रश्न हा आहे की  यापैकी किती प्रश्न ,समस्यांना  अधिवेशनात किमान स्पर्श झाला ? सोडवणूक तर कोसो दूरच .    

         अधिवेशाच्या तयारीसाठी १०० करोडचा खर्च झाल्याचे समजते . अधिवेशनाची उपलब्धी प्रश्नांकित  राहत असल्याने  एक प्रश्न   आता विचारण्याची वेळ आलेली आहे की  , जर करदात्या नागरिकांचे करोडो रुपये खर्च करून  "नागपूर येथे घेतल्या जाणाऱ्या 'उचलून ' अधिवेशन कितपत व्यवहार्य ठरते "?   नागपूरला अधिवेशन भरवायचे म्हटले की  शेकडो अधिकारी -कर्मचारी  , पोलीस कर्मचारी -अधिकारी ,  अगदी कँटीन चे कर्मचारी असा सर्व लवाजमा मुंबईहून नागपूरला हलवावा लागतो . बरे ! हा सर्व द्राविडी प्राणायाम करून देखील  त्याची फलनिष्पत्ती 'प्रश्नांकीतच ' राहणार असेल तर  भविष्यात हा द्राविडी प्राणायाम का करावयाचा ? उचलून अधिवेशनाचा अट्टाहासापायी  करोडो  रुपयांचा अनाठायी कशासाठी ? यावर देखील आता विचारमंथन होणे काळाची गरज  वाटते . त्या दृष्टीने हि  एक सुरुवात .

         मुला-मुलींची पसंती आणि वरपिता-वराकडील मंडळीच्या मागण्यांची पूर्तता झाली कि ‘ कार्यस्थळा ‘ चा विषय ऐरणीवर येतो . वधुपित्याला मनुष्यबळ , आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनॆ त्याच्या निवासस्थानी किंवा गावातील कार्यालयात लग्न करून देणे  सोयीस्कर असते . परंतु कधी कधी ना  वरपित्याच्या गावी ना वधूपित्याच्या गावी अश्या त्रयस्थ  ठिकाणी "उचलून " लग्न करून द्या असा वराकडील मंडळीचा अट्टाहास असतो . बालहट्टा नंतरचा हा सर्वात कठीण हट्ट असतो . या मागे तार्किक कोणते असा प्रतिप्रश्न वर पित्या कडे केल्यास त्याच्या कडे कुठलेही समर्पक उत्तर नसते. तसाच काहीसा प्रकार नागपूर येथे घेण्यात येणाऱ्या  अधिवेशनाबाबत दिसतो .

     अधिवेशन पूर्वकाळात मंत्री , आमदार ,निवास, मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री निवास स्थाने, , अधिकारी कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था याची डागडुजी , रंगरंगोटी यावर करोडो रुपये खर्च केले जातात . प्रत्यक्ष अधिवेशनासाठी मंत्रालयातून आवश्यक कागदपत्रे , फाईलींची रवानगी करणे , त्याची सुरक्षा , कर्मचारी अधिकारी , आमदार मंत्री यांच्या साठी प्रवास भत्ता , प्रत्यक्ष अधिवेशन काळात होणारा खर्च हा सर्व प्रकार म्हणजे "उचलून " लग्न करुन देण्याच्या अट्टाहासा करिता झालेल्या अतिरिक्त खर्च होय .

          कळीचा मुद्दा हा आहे कि , नागपूरला अधिवेशन घेण्य मागचे प्रमुख तार्किक कारण कोणते याचा खुलासा होणे गरजेचे वाटते . त्या त्या विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी अधिवेशन घेणे हे समर्थन तोकडे   कालबाहय  वाटते . विकास हाच जर सत्ताधाऱ्यांचा आणि विरोधकांचा प्रामाणिक हेतू असेल तर त्या साठी अधिवेशनाचे ठिकाण हा मुद्दा गौण ठरतो . आजवर नागपूरला अनेक अधिवेशने होऊन देखील  खरंच विदर्भाचा विकास खरंच झाला का ? जेथे अधिवेशनाचे ठिकाण , तेथील अधिक विकास हे सूत्र असते तर मुंबईचा तर खरंच स्वर्ग झाला असता . पण डोळे उघडे ठेवत मुंबईत चक्कर मारली तर मुंबईचे बकालपण सहज लक्षात येऊ शकते .

                   आता काळ बदलला आहे . दळणवळणाची साधने प्रगत झाली आहेत.  त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील माहिती - समस्या क्षणार्धात मंत्रालयात प्राप्त होऊ शकतात . आमदार खासदारांची आपल्या मतदार संघात नियमित दौरे होत असतात . जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्ह्याची इंत्यभूत माहिती असते . यामुळे मंत्रालयाचे मुख्य कार्यालय सोडून त्रयस्थ ठिकाणी अधिवेशन आणि ते हि राज्याची आर्थिक स्थिती सक्षम नसताना नाहक करोडो रुपयांचा चुराडा  करून घेणे कालसुसंगत वाटत नाही .

                सर्वात महत्वाचा आणि संशोधनाचा विषय हा आहे की  , " अधिवेशनाची उपलब्धी -उपयोजिता कोणती आणि किती ?" , सार्वजनिक हिताचे कोणते निर्णय या निमित्ताने घेतली जातात . लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांशी , आपल्या उत्तरदायित्वा संदर्भात संवेदनशील असतात का ? वर्तमानात सभागृहात अभ्यासपूर्ण चर्चा सवांद घडतात का ? अधिवेशनाच्या संपूर्ण कालवधीत प्रत्येक सत्रासाठी कितीजण प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होतात ? किमान किती प्रतिनिधी उपस्थित असतात ? उपस्थित असले तरी मनाने कितीजण तेथे हजार असतात ? याचा उहापोह होणे गरजेचे ठरते .

      अधिवेशनपूर्व  चहापाण्याच्या सोपस्कारावर बहिष्कार टाकण्यापासून विरोधी पक्षाच्या ‘ विरोधासाठी विरोधाचा कार्यक्रम सुरु होतो . फक्त बहिष्कारासाठीच चहापाण्याचा वापर केला जात असेल तर त्याचाही  पुनर्विचार व्हायला हवा .

    उचलून अधिवेशनचा मुद्दा तर आहेच . पण त्या पुढेही प्रश्न जाऊ शकतो अशी वर्तमानातील परिस्थिती आहे . अजून काही काळ हीच परिस्थती कायम राहिली तर , अधिवेशने हवेतच कशाला ? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो .  विधानसभा असो की लोकसभा , गेल्या ५ /  १० वर्षातील अधिवेशन बघता तो "टाइमपास " शो होतो आहे . कुठल्यातरी मुद्यावर आप-आपल्या भूमिकावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ठाम राहतात . त्यामुळे सर्वाधिक काळ हा तहकुबीतच जातो . अधिवेशनाचा खर्च मिनीटाला लाखो करोडो रुपये असतो परंतु याचे गांभीर्य कोणालाच दिसत नाही . एकमेकावर कुरघोडी करण्यासाठीचे प्रमुख साधन हा अधिवेशनाकडे बघण्याचा दृष्टीकोन लोकशाहीला मारक ठरतो आहे       

             दुर्दैवाने लोकशाहीचा चौथा स्तंभ हि बिरुदावली मिरविणारी प्रसारमाध्यमे देखील त्यातच सामील होतात . राजकीय पक्षाच्या आरोप प्रत्यारोप , कुरघोडीवर तासोनतास चर्चा करण्यात , अग्रलेख लिहण्यात धन्यता मानतात . उलटपक्षी त्यांनी संवेदनशील प्रश्न ऐरणीवर आणायला हवेत .           

       अधिवेशना नंतर अधिवेशने येतात आणि जातात . प्रश्न समस्या मात्र त्याच त्या राहतात . महाराष्ट्र स्थापनेच्या ६ दशका नंतरही सर्वांपर्यंत मुलभूत सुविधा पोहचत नसतील तर महाराष्ट्राच्या प्रगतीचे सिंहावलोकन होणे अनिवार्य दिसते . ज्या उद्देशाने अधिवेशन  भरवली जातात त्याची परिपूर्ती होते आहे का ? याचाही विचार व्हायला हवा . नवीन अधिवेशांची सुरुवात होण्यापूर्वी गत अधिवेशनातील घोषणा , आश्वासने याची पूर्तता झाली का ? त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली का ? या सर्वांचे मूल्यमापन व्हायला हवे . अधिवेशनाची  उदिष्ट परिपूर्ती सर्वात महत्वाची आहे . त्या कडे दुर्लक्ष करत उचलून अधिवेशनाची परंपरा साभाळण्यातून काय हशील होणार आहे हा जनतेचा खरा प्रश्न आहे .

      अधिवेशने केवळ सोपस्कारच ठरणार असतील तर कालांतराने त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकेल . ती वेळ येऊ नये या साठी वेळीच लोकप्रतिनिधीनी “उचलून”  अधिवेशन घेण्याचा सोपस्कार पाडण्यापेक्षा त्याच्या उदिष्टपुर्तीकडे अधिक लक्ष देणे जास्त संयुक्तिक ठरेल .                                                                                                                                                 

     अधिवेशने असावीत की नसावीत हा अगदीच टोकाचा प्रश्न  असला तरी 'उचलून ' नागपूरला अधिवेशन भरवण्यात कितपत अर्थ आहे ? असा सोपस्कार कितपत अर्थपूर्ण ठरतो ? यावर मात्र चर्चा तातडीने हवीच .



 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी

 ९८६९२२६२७२  danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा