THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २ जानेवारी, २०१६

भ्रष्टाचार -काळ्या व्यवहारास पूरक ठरणाऱ्या पूर्वपरवानगींना तिलांजली द्या


       ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार  आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून बिल्डर -राजकीय नेते -अधिकारी यांच्यातील संबंधाचा ' अर्थ ' अधोरेखीत झाला आहे . परमार डायरी नोंदीतून बांधकाम व्यावसायिकांना राजकीय पक्षांच्या  लाखोंच्या निवडणूक निधी पासून ते कर्मचारी -अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रसाद वाटावा लागतो हे कागदोपत्री सिद्ध झाले असले तरी  एक प्रश्न समोर आला तो म्हणजे अशा डायरीतून -चिठ्ठीतून समोर न येणाऱ्या नोकरशहा , राजकीय पदाधिकारी , गुंडपुंड , नियमांची तलवार ग्राहक -विकासकांना ' कापण्यासाठी वापरणारे पालिका कर्मचारी यासम घटकांचे काय ? बहुतांश बांधकाम व्यावसायिक आणि अधिकारी दोघेही धुतल्या तांदळासारखे नक्कीच नाहीत हे आता गुपीत राहिलेले नाही . दोघांचाही  स्वार्थ असल्यामुळे बऱ्याच वेळा दोघेही एकमेकांना सांभाळून घेत असल्यामुळे गोडीगुलाबीने चालणाऱ्या ' अर्थ ' संबंधातून खरा बळी जातो तो अतिंमत: घर घरेदी करणाऱ्या नागरिकांचा . शेवटी हा सर्वभार अप्रत्यक्षरीत्या त्याच्यावरच पडतो . बांधकाम व्यवसायातील गैरकृत्यात बळी जातो तो सामान्य नागरिकांचाच हे ' दिघा ' प्रकरणातून सिद्ध झाले आहे .  जे नियम सर्रासपणे पायदळी तुडवली जातात , नियमांचा ' अर्थ ' केवळ अडवणूक असा काढला जाऊन प्रशासन चालत असेन तर कशाला हवेत असले नियम . एकूणच राज्यातील बांधकाम व्यवसायातील नियमांची होणारी पायमल्ली लक्षात घेता "    भ्रष्टाचार -काळ्या व्यवहारास पूरक ठरणाऱ्या पूर्वपरवानगींना  तिलांजली द्या " अशी मागणी गैरलागू ठरणार नाही .

   समस्त भारतीय नागरीक , राज्य -केंद्र सरकारे , विविध सामाजिक संस्था , प्रसारमाध्यमे हे भ्रष्टाचार -गैरव्यवहार या विरोधात बोलत असले -लढत असले तरी भ्रष्टाचार ' अमर ' आहे कारण केवळ कुठल्याही  गंभीर साथीचा  रोग जडलेल्या पेशंटवर  औषध उपचार करून रोगाचे समूळ उच्चाटन असंभव असते , 'त्या ' रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वात गरजेची आणि महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्या रोगाच्या निर्मितीस -प्रसारास  पूरक ठरणाऱ्या  घटकांचे समूळ उच्चाटन आणि निराकरण . 
  
 जो पर्यंत उत्पत्तीच्या कारणमीमांसेचे  निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत तो पर्यंत अन्य उपाय केवळ धूळफेकच ठरतात . भ्रष्टाचार निर्मूलनाच्या बाबतीत आपल्याकडे हेच होताना दिसत आहे . भ्रष्टाचार निर्मूलनाच्या घोषणा केल्या जातात परंतु भ्रष्टाचारास पूरक ठरणाऱ्या गोष्टींकडे मात्र बहुतांश वेळा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते कारण भ्रष्टाचार निर्मूलना बाबत बहुतांश घटकांची आश्रू हे केवळ मगरीचे अश्रू असतात . हे वास्तव नसते तर सर्वजण भ्रष्टाचारा विरोधात लढत असताना तो भूगर्भापासून (खाणघोटाळा ) ते अवकाशापर्यंत सर्वव्यापी झाला नसता  ?

     बांधकाम व्यवसाय हा भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे.  या प्रकरणात विकासकाची ससेहोलपट-पिळवणूक  झाल्याचे वास्तव मान्य केले तरी बहुतांश विकासकही त्यांच्या ग्राहकांची ससेहोलपट-पिळवणूक करतच असतात हे देखील कटू वास्तव आहे . अर्थातच या सर्वास कारणीभूत आहे ती अनावश्यक नियमांचा झांगडगुंता . इमारतीच्या बांधकामासाठी जे नियम आहेत त्यांचा उपयोग यंत्रणाकडून अडवणूकीसाठीच केला जातो हे सर्वज्ञात आहे . एवढे नियम -परवानग्या असूनही आज किती बांधकामे नियमास धरून आहेत याचा शोध घेतल्यास अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील .


    नियमबाह्य इमारतींना अभय नाही एकमात्र नियम हवा : नियमांचा झांगडगुंता आणि त्याचा  भ्रष्टाचारासाठी होणारा वापर लक्षात घेता इमारतींना पूर्व परवानगीचा नियम काढून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम नियमानुसार आहे की नाही एवढे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असावे .

       मा . मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की , यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बांधकाम व्यवसायातील भ्रष्टाचाराचे कारण ठरणाऱ्या "  विविध परवानग्यांची " पूर्वअट काढून टाकावी  . शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना आपल्या कार्यकक्षेत बांधकाम क्षेत्रास अनिवार्य असणाऱ्या सर्व नियमांची यादी संकेतस्थळावर टाकणे अनिवार्य असावे . त्या नियमांचे पालन करत इमारत बांधावयाची आणि ती पूर्ण झाल्यावर " इमारत अधिकृत प्रमाणपत्रासाठी " अर्ज करवयाचा.  

     संबंधीत विभागा कडे फाईल आल्यानंतर (संपूर्ण पारदर्शकतेसाठी एक प्रत संकेतस्थळावर टाकण्याची सुविधा हवी )एक महिन्यात त्यावर अंतिम निर्णय देण्याचे बंधन असावे . असे केल्यास दुहेरी फायदा संभवतो . एक म्हणजे बांधकाम व्यावसायिकांची पिळवणूक होणार नाही तसेच पैसे घेऊन परवानगी देऊन अंतिमत: आपली जबाबदारी झटकणारया अधिकाऱ्यांवर उत्तरदायित्व असेन कारण परवानगी दिल्यानंतर आराखड्याला तिलांजली दिली हि पळवाट राहणार नाही . बांधकाम पुर्णत्वानंतर योग्यतेचे प्रमाणपत्र द्यावयाचे असल्यामुळे हा ' सूर्य -हा जयद्रथ ' अशा परिस्थितीमुळे भ्रष्टाचाराला वाव राहणार नाही . बांधकाम व्यावसायीकाला देखील  काम आराखड्या प्रमाणेच असल्यास कोणाला घाबरण्याचे कारण उरणार नाही .

      तळमजल्यावर कुठल्याही बांधकामांना परवानगी नसावी . हि जागा पूर्णपणे पार्किंगसाठीच असावी . सर्व विकासकांना कुठलीही परवानगी न घेता बांधकाम करण्याची अनुमती असावी . बांधकाम पूर्ण झाल्यावर बिल्डरने बांधलेल्या इमारतीचा आरखडा सादर करावा . जर इमारतीची निर्मिती  नियमांची -अटीची पूर्तता करून झाली असल्यास (च ) त्या बिल्डरला सदनिका विकण्याचा परवाना द्यावा . परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यावर परवानगीचे संपूर्ण उत्तरदायित्व असावे . परवनागी दिलेल्या इमारतींची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी खुली असावी . जर इमारत नियमानुसार नसेन तर थेटपणे ती अनधिकृत ठरवावी आणि त्या बिल्डरवर गुन्हा नोंदवावा . कुठल्याही परिस्थितीत अशा नियमबाह्य इमारतींना अभय मिळणार नाही एवढा एकच नियम पाळला जावा .  सगळा कसा सरळसोट व्यवहार . यामुळे ग्राहकांची फसवणूक हि टळेल , परवानगी देण्याघेण्यात होणारा भ्रष्टाचार दूर होईन आणि सुरज परमार प्रकरणाची पुनरावृत्तीही टळेल .

  होय ! एक गोष्ट नक्की की उपरोक्त उपाययोजना अंमलात आणली सरपंचा पासून खासदार आणि तलाठ्यापासून -आयुक्तांपर्यंत सर्वांचे हात कोरडे पडतील . त्यामुळे उपाय कितीही पटला , योग्य वाटला तरी तो प्रत्यक्षात अंमलात येणे अग्निदिव्यच ठरणार हे नक्की .   सरकार कितीही पारदर्शक असले , स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री असले तरी विद्यमान काळात असा धाडसी निर्णय मृगजळच वाटतो . अर्थातच यदाकदाचित तत्सम निर्णय घेतलाच तर एक गोष्ट नक्की की , बांधकाम व्यवसायातील ३०/४० टक्के काळ्य़ा उलाढालीस प्रतिबंध बसेन . तूर्त तरी असा निर्णय होईल असे स्वप्नरंजन करणे एवढेच आपल्या हातात आहे .
                                                                                                   
सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई .

                                                                                                                          danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा