THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, २६ मार्च, २०१३

रेल्वे बजेट प्रतिक्रिया :


                                                                        
" निरर्थक  आणि कालबाह्य " हा अग्रलेख सरकारच्या झापडबंद   कार्यसंस्कृतीवर लेझर किरण टाकणारा वाटला . आर्थिक तरतुदीचा विचार आणि नियोजन न करता प्रती वर्षी  घोषणा आणि त्यांची वारंवार पुनरावृत्ती  , घटना अंतर्गत  वार्षिक सोपस्कार , निवडणुकीतील मताची बेगमी करण्याचे  सत्ताधाऱ्यांचे साधन , सत्ताधारी पक्षावर तोंड सुख घेण्यासाठी विरोधी पक्षांना सुवर्णसंधी , प्रसार माध्यमांना बातमीसाठी खुराक आणि त्यावर कृती शुन्य चर्चा हा रुळलेला मार्ग सोडून लोकसत्ताने  स्वप्नापेक्षा वास्तवाची जाणीव करून देत  अधिक सजग , अभ्यासपूर्ण ,वास्तवाचे रूळ पकडत या अग्रलेखातून 'अर्थ ' हीन अर्थसंकल्पाची आवश्यकता काय ? हा लाख मोलाचा प्रश्न उपस्थित केला आहे .
 
  महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली चिरीमिरी पाहता  रेल्वे बजेट म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे महाराष्ट्राची उपेक्षा कायम ठेवत तोंडाला पाने पुसण्याचा वार्षिक कार्यक्रम होय  यावर शिक्का मोर्तब झाले  . देशाच्या एकूण महसुलात २० ते २५ टक्के महसूल वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्राची रेल्वे सोयी सुविधा बाबतच्या अपेक्षा ह्या " कोहळा देऊन आवळा मागण्याचा " प्रकार होय …. आणि तो हि न मिळण्याचा पायंडा यावर्षी कायम राहिला आहे . कल्याण -बीड मार्गाची मागणी मी लहान असल्यापासून ऐकत आहे , माझी मुलेही तेच ऐकत आहेत . कदाचित आणखी एक पिढी हि घोषणा ऐकण्यातच जाईल असे दिसते . मागीलवर्षीच्या किती घोषणा पुऱ्या  झाल्या याचा उहापोह ' चालू ' अर्थसंकल्प मांडताना व्हायला हवा .
   येथे सर्वात महत्वाचा मुद्दा मांडावयाचा आहे कि या बजेटची    विश्वासार्हता  किती याचाही विचार होणे क्रमप्राप्त ठरते  ?  श्री . लालूप्रसाद मंत्री असताना  गेली अनेक वर्षे भाववाढ न करता  रेल्वे नफ्यात दाखवली जात होती , त्यांना  रेल्वेला नफ्याच्या रुळावर आणल्यामुळे    ' मॅनेजमेंट गुरु ' हि पदवी दिली  गेली . आय आय एम अहमदाबाद येथील विद्यार्थ्यांना ही त्यांनी  ' मनेज मेंट विषयी मार्गदर्शन ' केले होते . मग गेल्या ५ वर्षात असे काय घडले कि रेल्वेचा तोटा वाढू लागला आणि वारंवार भाववाढ करावी लागली , तरी ही रेल्वेचा तोटा भरून निघत  नाही . सोन्याचे अंडी देणारी कोंबडी एकदम खुडूक कशी झाली . या अर्थसंकल्पानुसार आजमितीला रेल्वेचा खर्च आणि उत्पन्न यात तब्बल ९५ हजार कोटी रुपयांची तफावत आहे .उत्पन्नापेक्षा  खर्च जास्त आहे .  चालू वर्षात या तोट्यात २४,६०० कोटी रुपयांची वाढ होणार आहे . नेमके कोण दिशाभूल करत आहे . लालू बजेट ' मॅनेज ' तर करत नव्हते ना ?  लालूचे बजेट जर १०० टक्के खरे आणि रेल्वेला नफ्यात आणणारे असेल तर श्री . लालूप्रसाद  यादव यांना  रेल्वे मंत्री कायम ठेवणे देशहिताचे ठरणार नाही का ?  बजेटमधील विश्वासार्हतेचे घटनात्मक उत्तरदायित्व कोणाचे आणि ते सक्षमपणे पाळले जाते किंवा नाही हे पाहणे कोणाचे कर्तव्य आहे . हे वास्तव जनतेसमोर यायला हवे हीच अपेक्षा .
 रेल्वे खचाखच प्रवाश्यांनी भरून जात असताना आणि मालवाहतुकीला डिमांड असताना रेल्वे तोट्यात जातेच कशी ? ऐकीव माहितीनुसार रेल्वेचा एक  सीट क्रमांक दर्शवणारा अंक ३०/३५ रुपयाचा असतो .  कायम स्वरूपी डक्ट ची व्यवस्था शक्य असताना  प्रत्येकवेळी केबल टाकण्यासाठी अनेक किलोमीटर खोदकाम केले जाते . हि झाली वानगी दाखल उदाहरणे . सार्वत्रिक भ्रष्टाचाराची लागण हे रेल्वेला रुळावरून घसरवण्यात सिंहाचा वाट उचलत असणार या विषयी साशंकता बाळगण्याची गरज नसावी . ….बाकी  काही झाले तरी  लटकत प्रवास आम्हा  मुंबई करांच्या पाचवीला पुजलाच आहे  हे नागडे सत्य  आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा