संत आसाराम बापूंच्या होलिकोत्सवात होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययवर प्रसारमाध्यामानी ( खास करून इलेक्ट्रोनिक्स मेडीया ) टीकेची झोड उठवून आपली दुष्काळा विषयीची संवेदनशीलता प्रकट केली . महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी बापूच्या कार्यक्रमावर बंदी घालेपर्यंत तो विषय लावून धरला . एकीकडे जनता पाण्याच्या थेंबासाठी वणवण भटकत आहे तर एका कार्यक्रमासाठी २-२ टॅंकर पाण्याचा वापर अपव्यय ठरतो हे सप्रमाण सिद्ध करून प्रसारमाध्यामानी आपली सामाजिक बांधिलकी आणि उत्तरदायित्व अधोरेखीत केले त्यासाठी समस्त दुष्काळग्रस्त जनतेतर्फे माध्यमांचे जाहीर आभार .
होय , हे जरे खरे असले सामान्य नागरीकांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि याची उत्तरे प्रसारमाध्यामानी द्यायला हवीत . संत म्हणून घेणाऱ्यांची सामाजिक बांधिलकी अधिक असते आणि त्यांची कृती यास बाधा आणणारी असल्यामुळे निषेधार्ह आहेच या विषयी दुमत संभवत नाही . हे प्रश्न विचाराने म्हणजे बापूंच्या कृतीचे समर्थन नव्हे हे ध्यानात घ्यावे .
नागपूरला पाण्याचे दुर्भिक्ष आहे या विषयी दुमत संभवत नाही . पण ज्या नवी मुंबईतील कार्यक्रमात २ टॅंकर च्या वापरामुळे पाण्याच्या अपव्ययाचा मुददा लावून धरत थेट एका अभियंत्याचा बळी गेला त्या नवी मुंबईत पाण्याचा खरच दुष्काळ आहे का ? असेल तर त्याचे प्रतिबिंब दैनदिन वापरात ध्वनित होतो का ? पाण्यामुळे नवी मुंबईतील किती बांधकामे बंद आहेत . महानगरपालिकेचे आणि खाजगी सोसायट्यातील किती स्विमिंग टॅंक बंद ठेवले गेले आहेत ? प्रश्न यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्याचा नसून प्रसार माध्यमांच्या दुट्टपी न्यायाचा आहे . अधिकृत रित्या पैसे भरून मोठ मोठ्या सोसायटीत मोटारी धुण्यासाठी , पार्किंग धुण्यासाठी जो बेसुमार वापर केला जातो तो अपव्यय या संज्ञेत मोडत नाही का ? रिसॉर्ट मध्ये चालणारे रेनबो डान्स कुठले पाणी वापरतात ? मुंबईत काही रस्ते धुण्याचा प्रशासनाचा मनोदय आहे . तारांकित हॉटेल्समध्ये टबबाथ करिता कुठून पाणी येते ? हे प्रश्न माध्यमांना का पडत नाहीत किंवा पडून देखील त्याची वाच्यता का टाळली जाते हे सगळे अनाकलनीय आहे . प्रसारमाध्यमांच्या साक्षीने (लाईव्ह ) दहीहंडीच्या नावाने पाण्याचा अपव्यय होत असतो . त्याबाबत प्रसारमाध्यमे आज जी भूमिका घेतली आहे तशीच घेणार कि तो पर्यंत प्रसारमाध्यमांचे 'मतपरिवर्तन ' झालेले असेल हे पाहणे गरजेचे आहे .
ग्रामीण भागात आज जसे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तसेच दुर्भिक्ष विजेचे देखील आहे . गेली ५ /६ वर्षे ग्रामीण भाग भारनियमनाचा सामना करत आहे . काही भागात आजही १२-१२ तासांचे भारनियमन आहे . भारनियामानामुळे अनेक छोटे मोठ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे . लघु उद्योग बंद पडले आहेत . एमआयडिसी ओस पडत आहेत . शेतीला पाणी वेळेवर शक्य होत नाही . विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कंदील चिमण्यांचा आधार घ्यावा लागत आहेत . अंधाराचा फायदा घेत चोऱ्या -मारयांचे प्रमाण वाढल्यामुळे सुरेक्षेचा प्रश्न निर्माण होतो आहे .
उलटपक्षी शहरांमध्ये विजेची राजरोसपणे उधळपट्टी होते आहे . चौका चौकात हायमास्ट चा वापर आणि तो ही संपूर्ण रात्रभर हे विजेच्या अपव्ययाचा कळस होय . मॉल मधील झगमगाट , सूर्याला वाकुल्या दाखवणारे स्ट्रीट लाईट , बँक -कंपन्या -शैक्षणिक संस्था -दुकानाच्या पाट्यासाठी वापरली जाणारी वीज , सरकारी-खाजगी कार्यालये , निवास्थाने या ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा या साठी खुले आम पणे होणारा विजेचा अपव्यय प्रसार माध्यमांना दिसत नाही का ? जो न्याय बापूंच्या पाण्याच्या अपव्यायला लागू पडतो तोच न्याय शहरातील विजेच्या अपव्यया ला लागू केला जाणे प्रसारमाध्यमांचा बापू विरोधातील आवाजाला पुष्टी देणारा ठरेल . रस्त्यावरील लाईट चे नियोजन केले तरी खूप मोढ्या वीज वाचू शकेल . मध्यंतरी एका ओहरब्रिज वरील स्ट्रीट लाईटचे १२ लाख बिल थकल्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याचे वृत्त होते . यावरून शहरातील विजेचा बेसुमार वापर लक्षात येतो . आज ग्रामीण भागाची संपूर्ण आर्थिक यंत्रणा विजेच्या कमतरते अभावी मोडकळीस आली आहे . शहराकडील ओढी मागे विजेचा अभाव हे सर्वात मोठे कारण आहे . असे असताना भविष्यात प्रसारमाध्यमे खरच या विषयात लक्ष घालतील का हा खरा औस्तूक्याचा प्रश्न आहे .
एकूणच सामुहिक साधन संपत्तीच्या वापराबाबत आपल्याकडे उदासीनता आहे . वीजवापर असो व पाणी वापर असो या बाबतीत सर्वच समाजाचे प्रबोधन गरजेचे वाटते . पैसा -सत्ता -संपत्तीच्या जोरावर निसर्गावर जे अतिक्रमण होते आहे , नैसर्गिक साधन-स्त्रोतांचा जी वारेमाप उधळपट्टी होते आहे तिचे परिणाम दिसू लागले आहेत . वेळीच सावध झालो तर ठीक अन्यथा ..निसर्ग धडा शिकवेलच .
पुण्या -मुंबईत धुळवडीच्या निमित्ताने होणार्या पाण्याच्या अपव्यया विषयी प्रसारमाध्यमे काय भूमिका घेतात हे कळेलच . बुरा न मानो प्रसारमाध्यमांनो होली है !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा