चांद्या पासून बांद्या पर्यंत राज्यातील रस्त्यांवरील गतिरोधकांचे डोळसपणे अवलोकन केले असता स्पष्टपणे दिसून येते की गावखेड्यातील रस्त्यांपासून ते महामार्गावर अशास्त्रीय पद्धतीने उभारलेल्या गतिरोधकांमुळे , त्यावर पांढरे पट्टे नसल्याने व गतिरोधकाबाबतची पूर्वकल्पना असणारे बोर्ड्स नसल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे . वाहने वेगात असताना अचानक येणाऱ्या गतिरोधकांमुळे अनेक दुचाकी धारकांचे अपघात देखील झालेले असून त्यात त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे . अभियांत्रिकी नियमांना पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने उभारलेल्या गतिरोधकांमुळे अनेकांना शारीरिक व्याधी देखील जडलेल्या आहेत .
वर्तमानात लोकप्रतिनिधी , अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या दोन्ही बाजूला , इमारतीच्या बाजूला गतिरोधक असणे हि प्रतिष्ठेची बाब मानली गेलेली असल्याने अगदी २००/३०० मीटरवर स्पीडब्रेकर बसवलेले दिसतात . आष्टी तालुक्यातील एका रोडवर ६ किमी अंतरात तब्बल २२ स्पीडब्रेकर आहेत . तळेगाव -शिक्रापूर मुख्य मार्गावर देखील हीच परिस्थिती आहे . उरणफाटा ते उरण या रस्त्यावर नवी मुंबई पोलीस आयुक्त निवासासमोर डोंगर सदृश्य स्पीडब्रेकर उभारलेला दिसतो . हि केवळ वानगीदाखल उदाहरणे झाली .रस्त्याचे काम चालू असताना कंत्राटदाराला दमदाटी करायची स्पीडब्रेकर टाकून दे नाही तर रस्त्याच्या दर्जाची तक्रार करू अशा मनमानी पद्धतीने स्पीडब्रेकर्स निर्माण केले जात असल्याने " रस्त्याच्या मध्ये मध्ये स्पीडब्रेकर्स असण्याऐवजी स्पीडब्रेकर्सच्या मध्ये मध्ये रस्ता असल्याचे दिसते .
वस्तुतः स्पीड ब्रेकर उभारण्यासाठी देखील इंजिनियरींग असते . कोणत्या रस्त्यावर कोणत्या प्रकारची स्पीडब्रेकर असावीत याचे प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे .
अशास्त्रीय पद्धतीने स्पीडब्रेकर्स उभारले गेलेले असल्याने , त्यावर पांढरे पट्टे नसल्याने व स्पीडब्रेकर्स बाबतीत आगाऊ सूचना देणारे फलक नसल्याने राज्यात पाठीच्या मणक्याचे आजाराचे प्रमाण वाढलेले दिसते . वाहने जोरात आदळली जात असल्याने शारीरिक व्याधी जडतातच पण त्याच बरोबर वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होते .
अनियंत्रित पद्धतीने वाहन चालवणारे चालक , निहित वेग बंधनाचे पालन करणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघात होऊ नयेत यासाठी स्पीडब्रेकर्स असायलाच हवीत . याबाबत दुमत संभवत नाही . पण ते कोणत्या ठिकाणी हवेत , ते कशा प्रकारचे हवेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते "अधिकृत " म्हणजेच संबंधित रस्ता निर्माण करणाऱ्या यंत्रणेने परवानगी देऊन उभारलेले असावेत .
आपणास अलर्ट सिटिझन्स फोरम , नवी मुंबई च्या वतीने विनम्र निवेदन आहे की , आपण राज्यातील रस्ते निर्माण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था , सार्वजनिक बांधकाम विभाग , भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण , सर्व जिल्हाधिकारी व सर्व आयुक्त यांना निर्देश देऊन राज्यातील अनावश्यक स्पीडब्रेकर्स काढून टाकण्याचे व ज्या ठिकाणी गतिरोधक नियमानुसार आवश्यक आहेत त्या ठिकाणी " अभियांत्रिकी निकषांस अनुसरून स्पीडब्रेकर्स " उभारण्या बाबत निर्देश द्यावेत .
भारत हा अत्यंत प्रगतिशील देश असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी जमिनीवरील वास्तवात मात्र विसंगती दिसते . सोबत आयर्लंड या देशातील २ स्पीड ब्रेकर्सचे फोटो दिलेले आहेत . स्पीडब्रेकर्स कसे असावेत हे यातून स्पष्ट होते . अनेक पाश्चात्य देशात स्पीड ब्रेकर्सस वर पांढरे पट्टे मारण्यापेक्षा संपूर्ण स्पीडब्रेकरच रंगीत निर्माण केले जातात . आपल्याकडे मात्र काही ठिकाणी एकाच ठिकाणी अगदी ४/५ गतिरोधकांची माळच उभारलेली दिसते . असे स्पीड ब्रेकर्स कोणत्या अभियंत्यांच्या डोक्यातील सुपीक कल्पना आहे हा संशोधनाचा विषय आहे .
अलीकडच्या काळात वाहन चालकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दंडाची कारवाई केली जाते आहे . तंत्रज्ञानाचा वापर केवळ वाहन चालकांना दंडासाठी , आर्थिक वसुलीसाठी हा सीमित दृष्टिकोन न ठेवता स्पीड ब्रेकर्स उभारताना देखील अभियांत्रिकी विज्ञान -तंत्रज्ञानाचा वापर केला जायला हवा अशी जनतेची अपेक्षा आहे .
सुधीर लक्ष्मीकांत दाणी
संपर्क भ्रमणध्वनी : ९८६९२२६२७२
संपर्क इमेल आयडी : danisudhir@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा