THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १६ सप्टेंबर, २०१५

इतिहासाच्या नावाने नाकाश्रू गाळणाऱ्यानी अभ्यासपूर्वक त्यांना “ ज्ञात ” असणारा इतिहास समाजासमोर आणावा !!!



       मा . न्यायालयाने याचिका फेटाळल्या मुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा मार्ग मोकळा झाला आणि त्याचे सन्मानपूर्वक वितरणही झाले  . लोकशाही व्यवस्थेत विरोधाला देखील सन्मान आहे परंतु तो विरोध डोळस , विचारांचा प्रतिवाद विचारांनी करणारा हवा हि त्यासाठीची अलिखित अट आहे . ती लक्ष्मणरेषा न पाळली गेल्यामुळेच पुरस्काराला विरोध करणाऱ्यांचे हसे झाले .
 
    या निमित्ताने काही प्रश्न पुढे आले . विधायक कामासाठी कधीही एकत्र न येणारे बुध्तीवंत -प्रज्ञावंत साहित्यिक मंडळी , सामाजिक चळवळीतील मंडळी ' पुरंदरेना पुरस्कार नको तर ' काही समर्थनार्थ ' यासाठी का होईना एकत्र आली , बोलू लागली हे चांगले लक्षण मानायला हवे .परंतु आम्हा सामान्य नागरिकांना एक प्रश्न पडतो की ; राज्य नखशिखांत भ्रष्टाचारात बुडलेले असताना , शिक्षण संस्थांच्या घाऊक जागांच्या विक्रीमुळे गरीब जनता शिक्षणापासून वंचीत राहताना समोर दिसत असताना हि मंडळी कुठे होती . स्थानिक स्वराज्य संस्थातील खाबुगीरीमुळे एकही शहर, शहर म्हणण्याच्या लायकीचे राहिले नसताना , खाजगी बँकांच्या लुटीमुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहतो आहे यासाठी समाजाचे हित पाहणारी मंडळी कोर्टात का गेली नाही . आपल्या समाजाची शोकांतिका हिच आहे की दुर्गुण असणारी मंडळी एकत्र येतात परंतु चांगल्या विचाराच्या मंडळी आपल्या भोवतीच कुंपण घालून घेतात . आपल्याच कोशात राहतात .

   विकृत संस्कृतीचा उदय घातक : आपल्या कर्तृत्वाची रेषा परिश्रमपूर्वक - अभ्यासूपणे उंचावण्यापेक्षा दुसरयाची कर्तृत्व रेषा पुसून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची पुरोगामी (कु) संस्कृती महाराष्ट्रात उदयास येत आहे . याचे विद्यमान जिंवत उदाहरण म्हणजे  बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याबाबत हीन पातळीवर जाऊन केला जाणारा विरोध होय . अर्थातच काहींना या पुरस्काराशी काहीही देणेघेणे नाही त्यांना हवी आहे ती प्रसिद्धी मग ती नकारात्मक का असेना बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ अशा मंडळींचा सध्या माध्यमात सुळसुळाट झालेला दिसतो . दुर्दैवाने काही प्रसार माध्यमांची चाल सुद्धा तशीच असल्यामुळे अनावश्यक विषयांना कमाल प्रसिद्धी मिळताना दिसते .


   जात-धर्म या अफूच्या गोळीची गरज का पडते ?

 सोप्या वाटेची निवड हि माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती . जातीपातीचे राजकारण करत कर्तृत्वशुन्य राजकारणी याच सोप्या वाटेची निवड करतात . कुठलेही कर्तृत्व न करता निवडणुकीच्या वेळी केवळ जातीपातीचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेतात . जात-धर्म हि  अफूची गोळी आहे असे एका विचारवंताने म्हटले आहे  . एकदा का जातीपातीची ढाल समोर केली की बहुतांश जनता आपला विवेक काही काळासाठी हरवते आणि फरफटत जाते . राजकारणी आपली संधी साधून नेतात . या मुळेच देशाचा ६९वा स्वातंत्र्य दिन साजरा केल्या नंतरही आज अनेक खेडी वीज -पाणी -आरोग्य सेवा यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे .

   परंतु आता काळ बदलतो आहे . जनता आता आंधळे अनुकरण करत नाही कारण वेळोवेळी आलेल्या अनुभवातून ती शहाणी होते आहे आणि काही नेत्यांना ते नको आहे . सामान्य जनतेला हे हिन दर्जाचे राजकारण कळत नाही असे समजू नका . जातपात -धर्माचे राजकारण सामान्य जनतेला नकोच आहे परंतु आपल्या राजकारणाचा संपूर्ण डोलाराच त्यावर अवलंबून असणाऱ्यांना अशा हीन राजकारणाशिवाय पर्याय नसल्यामुळे आज समाजाला पदोपदी अनेक ज्वलंत प्रश्न भेडसावत असताना त्यावर कृती करण्यापेक्षा 'त्या ' मंडळीना हेच ' भूषणावह ' वाटते हे दुर्दैवी आहे . जातीपातीच्या बाबतीत महाराष्ट्राचा बिहार -युपी होतो आहे त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी आहे हा अपप्रचार थांबवा . किमान प्रसारमाध्यमांनी आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ या बिरुदावालीस जागावे हि सामान्य जनतेची अपेक्षा आहे . पुरंदरेंच्या इतिहासावर आक्षेप घेण्यात आपल्या क्रयशक्तीचा अपव्यय करण्यापेक्षा तथाकथित मंडळीनी त्यांना आवश्यक वाटणारा 'खरा ' इतिहास प्रसिद्ध करावा
  
पुरोगामित्वाचा दांभिकपणा उघड :

एक बरे झाले की राज ठाकरेंनी थेट ब्राम्हण आणि ब्राम्हणेत्तर असा पडद्या आडून चालणाऱ्या खेळाचे बिंग थेट भाष्य करून फोडले .एकीकडे धर्म ,जातपात आम्ही मानत नाही असे म्हणावयाचे तर दुसरीकडे राजकीय स्वार्थासाठी त्याचा खुबीने वापर करावयाचा आणि वर पुरोगामित्वाचा बुक्का लावून मिरवायचे हा काही राजकीय पक्षांची धूळफेक या निमित्ताने उघड झाली हे बरेच झाले . मुळात काही भोळसट कल्पनांचे गेल्या काही वर्षात बीजारोपण झाले आहे त्या पैकी काही अशा : अल्पसंख्याकांचे लांगुनचालन म्हणजे निधर्मी , ब्राम्हणांना शिव्या घालणे म्हणजे जातपात न मानणारे पुरोगामीत्व  . तथाकथीत बुद्धिवादी ,समाजसुधारक , समाजाचे तारणहार यांचा प्रामाणिकपणाच प्रश्नांकित आहे कारण आजवर या मंडळींनी समाजाच्या हितासाठी , विधायक गोष्टींसाठी कधी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे , समाजाला रोज सामोरे जाव्या लागणाऱ्या जसे शिक्षण -आरोग्य-घरखरेदी या सम गोष्टीतून होणाऱ्या अन्याया विरोधात कधी जनहीत याचिका केल्याचे दिसत नाही . वर्तमान समाजाचे दुर्दैव्य हेच आहे की विघातक कामासाठी एकत्र येणारी मंडळी विधायक कामासाठी मात्र एकत्र येत नाहीत . त्याच बरोबर विरोध करणाऱ्यांनी २ मिनिटे शुद्धीत डोळे बंद करून आपला स्वतःचा  ' इतिहास ' एकदा तपासून पाहावा.

    ….  तर मग खरा इतिहास तुम्ही लिहाना !

 सर्वात महत्वाचा मुद्द्दा हा आहे की ज्यांचा पुरंदरेच्या इतिहास संशोधनावर आक्षेप आहे , त्यांनी लिहलेल्या इतिहासामुळे ' मुळ ' इतिहासाचे विकृतीकरण झाले असा आरोप आहे त्यांनी त्यांना माहित असलेला 'खरा, समाजाला दिशा देणारा ' इतिहास समोर का आणला नाही . या पुरस्काराला विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या विचारवंताना -बुद्धिवंताना एक नम्र विनंती आहे की ,त्यांनी त्यांना ज्ञात असलेला इतिहास समाजासमोर आणावा . ते अधिक संयुक्तिक ठरेल .
    पुरोगामित्वाचा झेंडा खांद्यावर घेत फिरणाऱ्याच्या उक्तीत आणि कृतीत किती विसंगती आहे हे राज्यातील सर्वात मोठी आणि पुरोगामी असणाऱ्या ' रयत ' शिक्षण संस्थेत किती ' ब्राम्हण ' शिक्षक -प्राध्यापक आहेत याचा लेखाजोखा पाहिल्यास स्पष्ट होते . कदाचीत त्यांना अभिप्रेत  असणारी ' ती ' पात्रता ब्राम्हण उमेदवारांकडे नसल्यामुळे असे होत असावे . समाजातील गोरगरिबांची पिळवणूक करणारे ,जमीनजुमला हडप करणारे , डोनेशन अभावी शिक्षणा पासून वंचित ठेवणारे , सावकारकी करत लुटणारे कोण आहेत ? याचा एकदा इतिहास तपासून पाहावा आणि मग इतरांना दोष द्यावा . दुसऱ्यांना दोष देत आपले कर्तृत्व सिद्ध करणारी विकृतीला चाप बसायला हवा . सामान्य जनतेला जाती-पातीशी काही देणेघेणे नसते त्याची खरी गरज भासते ती कुठल्याही विधायक कामाशिवाय राजकारण करणाऱ्यांना आणि त्यासाठीच  असा हीन विरोध केला जातो . 

    
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा