THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २४ डिसेंबर, २०२२

भारतीय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पारदर्शकतेचे वावडेच

 

स्वातंत्र्यपूर्व काळातील कायद्याची ढाल पुढे करणाऱ्या आयुक्तांनी स्वातंत्र्य पश्चात कायद्याची अंमलबजावणीचे कर्तव्य पार  पाडावे !

           ‘साथरोग कायदा १८९७’ आणि ‘आपत्ती निवारण कायदा २००५’नुसार  करोनाकाळात केलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण किंवा चौकशी तुम्हाला करता येणार नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाने नियंत्रक व महालेखा परीक्षकांना (कॅग) पत्राद्वारे  कळवले आहे.   महापालिकेची हि भूमिका   "उल्टा चोर कोतवाल को डांटे"  या धाटणीतील ठरते . 

        डोळसपणे पाहिले तर पालिकेची  कोरोना काळातील चौकशीला खरेदी आणि  कंत्राटाच्या चौकशीला नकार हा एकप्रकारे आर्थिक लूट आणि अनागोंदीवर शिक्कामोर्तब होय  !  कोरोना कालावधीतील कारभार स्वच्छ असता तर पालिकेला  १८९७ चा कायदा उकरून काढण्याची गरज  पडली नसती . 

              साथरोग कायदा लागू असताना केलेल्या खर्चाचे लेखा परीक्षण होऊ शकत नाही अशी  कायद्यात तरतूद असल्याची पालिकेचे म्हणणे आहे . या कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्तीने साथरोग आटोक्यात आणण्यासाठी काही निर्णय घेतले असल्यास त्याविरोधात या कायद्यांतर्गत सर्वोच्च न्यायालयाव्यतिरिक्त कुठेही खटला चालवता येत नाही, असे साथरोग कायद्यातील कलम ४ मध्ये नमूद करण्यात असल्याचे सांगत पालिका आयुक्तांनी राज्य शासनाच्या विनंतीनुसार चौकशीला सरळ सरळ विरोध दर्शविला आहे .

              पालिका १८९७ च्या कायद्याचा आधार घेताना हि विसरलेली दिसते आहे की हा कायदा निर्माण करताना राजकीय -प्रशासकीय व्यवस्थेची नैतिकता गृहीत धरलेली आहे . स्वातंत्र्य प्राप्तीचा काळ जसा जसा लोटला जात आहे तशी तशी नैतिकता लोप पावत आहे . वर्तमानात नैतिकतेची जागा " मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा " प्रवृत्तीने घेतलेली आहे . त्या अर्थाने सदरील कायदा वर्तमानात गैरलागू पडतो .

               अर्थातच राज्य शासनाच्या सहमतीशिवाय आयुक्त असे पत्र धाडू शकत नाहीत हे उघड आहे . याचा अर्थ हाच होतो की  मुंबई पालिकेच्या १२ हजार करोड रुपयांच्या चौकशी मागे राज्य शासनाचा केवळ राजकीय स्वार्थ आहे . शिवसेनेला कॉर्नर करण्यासाठी हे  पाऊल उचलले दिसते . भ्रष्टाचाराला खणून काढणे हा "प्रामाणिक उद्देश " असता तर  सरकारने पालिकेच्या कोरोना कालावधीतील चौकशी बाबत बोटचेपे धोरण स्वीकारले नसते हे नक्की .

              मुख्य मुद्दा हा आहे की , स्वातंत्र्य प्राप्त भारतात लोकशाही व्यवस्था असल्याने संविधानाने दिलेल्या घटनात्मक अधिकारांनुसार पालिकेचा कारभार जनतेसाठी सदैव्य खुला असणे अभिप्रेत आहे . तसा कायदाच आहे . ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंतचा सर्व कारभार पब्लीक डोमेनवर उपलब्ध असण्याबाबतचा नियमच आहे  . १८९७ च्या कायद्याची आठवण ठेवणाऱ्या पालिका आयुक्तांना मात्र "पारदर्शकतेबाबतच्या कायद्याचा " सोयीस्कर " विसर  पडलेला  दिसतो .

           हे नागडे सत्य आहे की  मुंबई पालिका प्रशासनासह सर्वच पालिकांनी , नगरपालिकांनी , राज्य -केंद्र सरकारच्या कोरोना संलग्न यंत्रणांनी  कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी  प्रत्येक नागरिकाला सातत्याने हात धुण्याचा सल्ला देता देता   "हात धुऊन " घेतलेले आहेत .   शक्य त्या ठिकाणी  आणि शक्य तेवढ्या  प्रमाणावर आर्थिक लूट केलेली आहे .   कोरोना कालावधीतील खर्चाची तटस्थ यंत्रणे मार्फत चौकशी केली तर  राज्यातील बोटावर मोजता येतील असे अपवाद वगळता  सर्वच्या सर्व आयुक्त -अधिकारी घरी जातील . साथरोग कायदा आणि आपत्ती निवारण कायद्याच्या नावाखाली आर्थिक अनागोंदी लपवण्यासाठीच पालिका प्रशासनाची  धडपड सुरु दिसते आहे . 

            केवळ अधिकारीच नाही तर पालिकेच्या मार्शल नी , ट्रॅफिक पोलिसांनी मास्क च्या नावाखाली सामान्य नागरिकाला अक्षरशः लुबाडलेले आहे . संधी शोधून शोधून जनतेला लुटण्याची सवय लागलेल्या भारतीय नोकरशाहीला आणि  नेत्यांना कोरोना आपत्ती हि लुटण्यासाठी सुवर्ण संधीच होती आणि तिचा पुरेपूर लाभ  सर्वानी उठवलेला आहे  .

जनतेची  मुख्य मागणी :  

    महाराष्ट्र्रातील करदात्या नागरिकांच्या वतीने   मुंबई पालिका आयुक्त आणि अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निवेदन आहे की  , स्वातंत्र्यपूर्व काळातील कायदे -नियमांचे ज्ञान पाजळणाऱ्या प्रशासनाने स्वातंत्र्यपश्चात कायदे -नियमांची आठवण ठेवत पालिकेचा कारभार जनतेच्या पैशातून जनतेसाठीच चालवला जात असल्याचे  भान ठेवत "पै -पै चा ताळेबंद " अँप -संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेसाठी खुला करावा .




 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई . 9869226272

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा