THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

..... तर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाच घेऊ नयेत !

               पुरोगामी  महाराष्ट्रातील करोडो मतदारांनी  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदान केले . निवडणूक आयोगाने मतपेट्या उघडल्या आणि निकाल जाहीर केला . निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर वोटिंग मशिन्स मधील डेटा डिलीट केला असेल त्याच पद्धतीने राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदारांच्या मताला 'डिलीट ' केले आणि आपापल्या सोयीने , राजकीय तडजोडी , कुरघोडी , पळवापळवी , घुसखोरी ,बंडखोरी अशा सर्व मार्गांचा वापर करत मनमानी पद्धतीने सरकार बनवले-बिघडवले-पाडले .

             मतदारांनी दिलेल्या 'मता' ला गाडून आजवर प्रत्येक  पक्षाचे आमदार हे  सरकार मध्ये आणि सरकार बाहेत अशा प्रकारच्या विसंगत भूमिका बजावताना दिसलेले  आहेत . गेल्या वर्षात २८८ पैकी सर्वच आमदार हे सत्ताधारी झालेले दिसतात तर सर्वच आमदार विरोधी झालेले आहेत . राजकारणाच्या या घाणेरड्या खेळास 'चाणक्य नीती ' सारखे गोंडस नाव दिले जात असले तरी 'डोळसपणे ' पाहिले तर हि लोकशाहीची क्रूर थट्टाच ठरते . लोकशाही व्यवस्थेत मतदाराला 'राजा ' असे संबोधले जात असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीनंतर मतदारांच्या मताला काडीचीही किंमत दिली जात नसेल तर त्यास लोकशाही व्यवस्था संबोधणे कितपत रास्त ठरते हा कळीचा प्रश्न आहे .

                 मान्य आहे की   'तडजोडी ' या राजकीय व्यवस्थेचा अविभाज्य अंग आहे पण याचा अर्थ असा नव्हे की  " अगदी काहीही  करायचे "  ( काहीही या अर्थाने की अगदी पक्षच्या पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार )  आणि जनतेने ते निमूटपणे मान्य करायचे आणि तरीही जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था अशी दवंडी पिटत राहायचे .

                  एकुणातच महाराष्ट्रात अशी राजकीय परिस्थिती आहे की , मतदार रात्री झोपताना असणारे सरकार आणि दुसऱ्या दिवशी  सकाळी  असणारे सरकार सारखेच असेल  याची खात्री नाही . मतदार सकाळी उठताना असणारे मुख्यमंत्री संध्याकाळी असतीलच असे नाही . अशा प्रकारची राजकीय परिस्थिती महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरू शकते . राजकीय अस्थिरता असल्याने ना प्रशासनावर धाक उरला आहे , ना उद्योजकांना महाराष्ट्रावर विश्वास उरलेला आहे .

   सर्वात खेदाची गोष्ट हि आहे की  निवडणूक आयोग या कडे अशा पद्धतीने पाहताना दिसतो आहे की  अशा गोष्टींशी आपला दुरान्वये संबंध नाही . लोकशाही व्यवस्थेने आपल्यावर  दिलेले उत्तर दायित्व म्हणजे निवडणुका घ्या आणि धुतराष्ट्र -गांधारी च्या नजरेतून वर्ष सर्व काही पाहत रहा . प्रश्न हा आहे की  सन्माननीय टी .एन . शेषन सारखे निवडणूक आयुक्त असते तर  हा राजकारणाचा खेळ इतका बिनधास्त पणे खेळला गेला असता का ? खरे तर निवडणूक आयोग हि स्वायत्त यंत्रणा असल्याने  कालानुरूप लोकशाही व्यवस्थेत शिरकाव करणारे दोष निवारण करण्यासाठी निवडणूक आयोगाने काळानुसार उपाय योजणे अभिप्रेत आहे . 

 महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ज्या प्रकारचा राजकीय खेळ 'चालू ' आहे त्याचा भविष्यातील लोकशाहीला संभावणारा धोका लक्षात घेत निवडणूक आयोगाने अशा प्रकारांना  आळा घालण्यासाठी वर्तमानातील नियम -कायद्यात तातडीने बदल करणे अपेक्षित आहे . परंतू आत्तापर्यतची निवडणूक आयोगाची भूमिका लक्षात घेता  भविष्यात देखील अशा "सत्तापिपासू " राजकीय युत्या -आघाड्यांना प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक आयोगा कडून काही पाऊले उचलली जातील अशी  खात्री वाटत नाही .

  या पार्श्वभूमीवर  निवडणूक आयोगाला  एकाच गोष्टीची मागणी करणे मतदारांच्या हातात उरते . ती गोष्ट म्हणजे .... " जर भविष्यात देखील मतदारांच्या मताला तिलांजली देत , मतदारांच्या मताची कवडी किंमत करत , मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मतदान केले तरी कोणते सरकार सत्तेत येणार -जाणार हे निवडून आलेले उमेदवारच ठरवणार असतील .... अर्थातच केवळ निवडणूक आयोगच नव्हे तर लोकशाहीच्या जतन -संवर्धनास घटनेने जबाबदार असणारे कोणतीच यंत्रणा जर लोकशाहीला मारक ठरणाऱ्या गोष्टीला पायबंद घालणारी   पाऊले उचलणार नसतील तर  निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा  निवडणुकाच घेऊ नयेत ".  

वर्ष झाले की  आहे त्याच आमदारांना पुन्हा आपापल्या मर्जीनुसार हव्या त्या पक्षाला पाठिंबा देत सरकार 'बनवण्याची ' संधी द्यावी . पुन्हा वर्ष झाले की  पुन्हा त्यांनाच संधी ... अशी लोकशाही पद्धती सुरु करावी . यामुळे निवडणुकीवर खर्च होईल ना मतदारांना पशात्ताप !

लोकशाही व्यवस्थेत   समस्या -प्रश्नांचे निराकरण करणाऱ्या यंत्रणांच जर समस्या -प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असतील तर मग समस्या कोणाकडे मांडायची हि वर्तमान लोकशाही व्यवस्थेतील सर्वात मोठी समस्या ठरते आहे . 

 


 सुधीर दाणी ९८६९२२६२७२  

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा